श्रीरामपूर येथे थाटात पार पडले चौथे युगस्त्री फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन
श्रीरामपूर : सावित्रीबाईच्या पत्रामध्ये असणारा फातिमाबी शेख यांचा उल्लेख त्यांचं अस्तित्व असणारा महत्त्वाचा पुरावा असल्याचा उल्लेख करून फातिमाबी शेख यांचे काळजातले स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आज त्यांच्या नावाने साहित्यिक सोहळे साजरे होत आहेत. मुस्लिम मराठी स्त्री साहित्यिक मोठ्या प्रमाणात लिहीत आहेत. हा मराठी सांस्कृतिक संचिताचा गौरव आहे, असं प्रतिपादन संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केले.
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र शाखा अहिल्यानगर आयोजित चौथे युगस्त्री फातेमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कवयित्री मेहमूदा रसूल शेख यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे थाटात पार पडले. या प्रसंगी डॉक्टर श्रीपाल सबनीस आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खाजा बागवान व संस्थापक शफी बोल्डेकर यांनी केले. याच कार्यक्रमात स्पंदन स्मरणिका,' युगस्त्री फातिमाबी शेख ' प्रातिनिधीक काव्यसंग्रह संपादन अनिसा सिकंदर शेख तसेच त्यांचाच काव्यसप्तक हा काव्यसंग्रह, काळ काळांत, व अहमदनगर साहित्यिक सूची शब्बीर बिलाल, 'शेवटी सोबत काहीच येत नाही ' नसीम जमादार, खाजा बागवान लिखीत " सांस्कृतिक सावल्या समिक्षा ग्रंथ '' या ग्रंथाचे प्रकाशन डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
फातिमाबी शेख साहित्यरत्न पुरस्कार सायराबानो चौगुले यांना तर ॲड. सिकंदर लतीफ शेख यांच्या स्मरणार्थ समाजभूषण पुरस्कार शहाजहान शेख व मुख्याध्यापक हुसेन बागवान यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार निलोफर फणिबंद यांना प्रदान करण्यात आला.
जयंतीनिमित्त फातीमाबी शेखवर स्पर्धा घेण्यात आल्या. ते बक्षीस पात्र यशवंत हिराबाई पगारे, कृष्णा अविनाश क्षीरसागर, ज्योत्स्ना डासाळकर, दादासाहेब शेख यांचा सन्मान करण्यात आला, तसेच 'इख्लास रमजान' अंकातील उत्कृष्ट कविता बा. ह. मगदूम, सुमैय्या चौधरी, आलिया गोहर यांना सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक शफी बोल्डेकर , संस्थाध्यक्ष हाशम पटेल, संस्था सचिव डॉक्टर सय्यद जब्बार पटेल, प्राचार्य इ. जा. तांबोळी, गझलकार बा. ह. मगदूम, प्रा . सय्यद अल्लाउद्दीन आदि मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.
वर्तमान चिंतन मांडताना हिंदू-मुस्लिम भाईचारा कुठे हरवला, या विषयीचे चिंतन करताना आमची हिंदू-मुस्लिम संत साहित्य परंपरा जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्षा मेहमूदा शेख यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. राहुल हांडे यांनी फातिमाबी शेख यांच्या विषयी आपले विचार मांडून त्यांचे अस्तित्व सिद्ध केले.
फातिमाबीची जयंती शाळा-कॉलेजात, सरकारी-निमसरकारी दप्तरात साजरी व्हावी, फातिमा शेख च्या नावे विद्यापीठ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे फातिमाबी शेख प्रातिनिधिक काव्य संग्रहाच्या संपादिका अनिसा सिकंदर आपल्या मनोगतात म्हणाल्या. दुपार सत्रात कवी संमेलनाध्यक्ष नुरजहाँ शेख यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन यशस्वीरित्या पार पडले. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था सर्व पदाधिकारी अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष दिलशाद सय्यद, स्वागताध्यक्ष डॉक्टर सलीम सिकंदर शेख, रज्जाक शेख, केंद्रिय सहसचिव अनिसा सिकंदर शेख, केंद्रिय उपाध्यक्ष खाजा बागवान, शबाना तांबोळी, बेनजीर शेख यांनी विशेष प्रयत्न केले.
... ठळक ...
"समाजाच्या व्यथा, वेदना, प्रश्न साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून मांडणे आवश्यक." - संमेलनाध्यक्षा मेहमूदा शेख
फातिमा शेख यांना जयंती पुरते मर्यादित न ठेवता कवितेत जिवंत ठेवा विचारात जपा आणि कृतीत उतरवा- कवीसंमेलनाध्यक्ष नूरजहा शेख
"फातिमाबी शेख जयंती पुण्यतिथी साजरी व्हावी व फातिमाचे नावे विद्यापीठ असावे" - युगस्त्री फातिमाबी शेख प्रातिनिधिक संग्रहाच्या संपादिका अनिसा सिकंदर
