शास्वत समाधानासाठी प्रेमाची अधिस्विकृती झाली पाहिजे - विवेक घळसासी

shivrajya patra

तीन दिवसीय विवेकाची अमृतवाणीचा समारोप

सोलापूर : सेवा समर्पण यातूनच सिध्दी प्राप्त होते आणि शास्वत समाधान मिळवण्यासाठी प्रेमाची भक्तीची अधिस्विकृती झाली पाहिजे, असं प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पु. ना. गाडगीळ यांच्या सहकार्याने आयोजित विवेकाची अमृतवाणी च्या तिसर्‍या दिवशी तथा समारोपाप्रसंगी ते बोलत होते. 

प्रारंभी आर्यन क्रिएशनच्या वतीने विनायक होटकर यांच्या हस्ते निरूपणकार विवेक घळसासी यांना पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटरमध्ये सकाळी 6.25 वाजता प्रवचनाला प्रारंभ झाला.

श्रीनारद भक्तीसूत्र यामध्ये प्रेम भक्ती, नामस्मरण, सेवा, समर्पण यातून आत्म शुध्दी होते आणि त्याच मार्गाने ईश्‍वराकडे जाता येते. सौभाग्याचे प्रतिक म्हणून महिला कपाळावर सिंदूर लावतात तसेच पुरूषांनी आपल्या कपाळावर तिलक लावल्यास ते शक्तीचे प्रतिक दिसून येते. 

सनातन हिंदु राष्ट्र होण्याची ही काळाची गरज आहे. नाम स्मरणातून भक्तीची प्राप्ती होते. सेवेने अंतःकरण शुध्द होते. तृप्तीमध्ये कृतार्थता आहे. चांगले ऐकले तरच चांगले बोलता येते, म्हणूनच कानाचा समुद्र करा आणि ऐकण्याची नदी अखंड प्रवाहित झाली पाहिजे, असेही श्रीनारद भक्ती सुत्रात सांगितल्याचे निरूपणकार विवेक घळसासी यांनी सांगितले. 

दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी गेल्या 15 वर्षापासून अखंडपणे पहाटेच्या सुमारास सुरू असून यंदा
च्या वर्षी श्रीनारद भक्तीसूत्र या विषयावर प्रवचन करण्यात आले. तीनही दिवस रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. 

अक्कलकोट, मंगळवेढा, धाराशिव, पुणे, सांगोला या ठिकाणाहून अनेकजणांनी सकाळी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती. महिला पुरूष आणि युवकांची गर्दी होती. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागांवर यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्या प्रयत्नातून आर्यन क्रिएशन आणि पु. ना. गाडगीळ अ‍ॅन्ड सन्स यांच्या सहकार्यातून तसेच मसापचे उपाध्यक्ष प्रा. दिपक देशपांडे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, खजिनदार अमोल धाबळे, प्रकाश मोकाशे, अविनाश महागांवकर, प्रसिध्दीप्रमुख विनायक होटकर यांच्या परिश्रमामुळे हा तीन दिवसीय विवेकाची अमृतवाणी कार्यक्रम यशस्वी झाला. 

या कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिध्द गायिका वीणा बादरायणी यांनी आपल्या सुमुधूर आवाजातून पसायदान गायले आणि कार्यक्रमाचा समारोप झाला.

छायाचित्र - नागेश दंतकाळे


To Top