सोलापूर : भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ४६ अन्वये समाजातील दुर्बल व वंचित घटकांच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून, महामानव राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा" कार्यक्रम दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
या सेवा पंधरवड्यात ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांसह विविध व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या, परंतु त्रुटी पूर्तते अभावी प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. संबंधित अर्जदारांना ईमेलद्वारे सूचना देण्यात आलेल्या असून, त्रुटी पूर्तता न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सर्व माहितीची स्वतः खात्री करून योग्य कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीस दिवाणी न्यायालयाचे अधिकार असून, समितीच्या निर्णयाला फक्त उच्च न्यायालयात आव्हान देता येते. त्यामुळे कोणत्याही अर्जदाराने खोटी कागदपत्रे सादर करू नयेत, त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करू नये, अशा मध्यस्थी करणाऱ्यांच्या आमिषास बळी पडू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
सन २०२५-२६ मध्ये १ एप्रिलपासून महाराष्ट्रात सर्वाधिक १६,३७२ वैधता प्रमाणपत्रे ऑनलाइन निर्गमित करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयात परिपूर्ण अर्ज सादर करून या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त रवींद्र कदम पाटील, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सोलापूर यांनी केले आहे.
