'जे.पी. शांतता पुरस्कार २०२५' : शांती, ऐक्य आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश
जन्मेजयराजे भोसले, आ. विठ्ठल कटकधोंड, ॲड. यु.एन. बेरिया, सौ. अनिता फॅरन ब्राँखस्ट आणि प्रार्थना फाउंडेशन यांना सन्मानित
सोलापूर : आज जगाला शस्त्रांची नाही, तर विचारांची व मूल्यांची गरज आहे. धर्मांनी दिलेला शांतीचा संदेश आचरणात आणला तर हिंसा संपुष्टात येईल, असं प्रतिपादन वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी केले.
मानवतेची सेवा आणि सामुदायिक सौहार्द वाढविण्याचे ध्येय बाळगणारी जॉईन फॉर पीस ही एक अग्रगण्य स्वयंसेवी संस्था आहे. २१ सप्टेंबर, जागतिक शांतता दिनाच्या औचित्याने जॉईन फॉर पीस मल्टीपर्पज सोसायटी, सोलापूरतर्फे आयोजित जे. पी. शांतता पुरस्कार २०२५ सोहळा सोलापूर उर्दू घरच्या सभागृहात दिमाखात पार पडला. या सोहळ्यास प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जॉईन फॉर पीस संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला होते.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जैनुद्दीन मुल्ला यांनी प्रास्ताविक करून सर्वांचं स्वागत केले. पुरस्कार विजेत्यांचा परिचय व संस्थेचे माहिती सचिव प्रा. जैनुद्दीन पटेल व उपाध्यक्ष इरफान लालकोट यांनी करून दिली. नवाझ नाईकवाडी यांच्या प्रार्थनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. युनूस शेख यांनी केले.
या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील विविध वर्गातील लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे आणि शांतता, समता व मानवाधिकारांची जपणूक करणे आहे. विविध क्षेत्रात शांतता, ऐक्य व सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना जे.बी. शांतता पुरस्कार २०२५ ने गौरविण्यात आले.
यामध्ये स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, सर्वसमावेशक राजकारणी नागठाण विधानसभा विजयपूर कर्नाटकचे आमदार विठ्ठल डी. कटकधोंड, सोलापूरचे माजी महापौर ॲड. यु. एन. बेरिया, रुग्णसेविका अनिता फॅरन ब्राँखस्ट आणि अनाथ बालक व वृद्धांची सेवा करणारी संस्था प्रार्थना फाऊंडेशन यांना इतिहास तज्ञ प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे मतीन बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
... कोण काय म्हणाले ?
... तर समाज शांत होतो : प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला
"शांतीची सुरुवात माणसाच्या मनातून होते जर मन शांत असेल तर समाज शांत होतो.” असं प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला यांनी केले.
भुकेल्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हीच खरी शांती : जन्मेजयराजे भोसले
“गरीब, भुकेल्याला अन्न देणे आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे म्हणजेच खरी शांती.”, असं जन्मेजयराजे भोसले यांनी पुरस्काराचे उत्तर देताना आपल्या मनोगतात सांगितले.
एकतेतूनच समाज प्रगती करतो.” : आमदार विठ्ठल कटकधोंड
“राजकारण हे लोकसेवेसाठी असते, लोकांत सौहार्द टिकवणे ही खरी नेत्याची जबाबदारी आहे. मतभेद असले तरी एकतेतूनच समाज प्रगती करतो.” असं आमदार विठ्ठल कटकधोंड यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
एकतेशिवाय समाजाचा विकास पूर्ण होऊ शकत नाही.” : ॲड. यु.एन. बेरिया
“लोकशाहीची ताकद एकतेत आहे. एकतेशिवाय समाजाचा कोणताही विकास पूर्ण होऊ शकत नाही.” असं ॲड. यु.एन. बेरिया यांनी सांगितले.
... महिलांना समान संधी मिळाल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही.” : सौ. अनिता फॅरन ब्राँखस्ट
“ समाजात स्थिर शांती महिलांना समान संधी मिळाल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही.” अशी भूमिका सौ. अनिता फॅरन ब्राँखस्ट यांनी मांडली.
... मदत करण्याची वृत्ती म्हणजेच शांती होय. ” : प्रसाद मोहिते
“लहान प्रयत्नही मोठे परिवर्तन घडवतात. एकमेकांना मदत करण्याची वृत्ती म्हणजेच शांती होय ” असं मत जे. पी. शांतता पुरस्काराची मानकरी संस्था प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे. पी. संस्थेचे सचिव प्रा. जैनुद्दीन पटेल, उपाध्यक्ष इरफान लालकोट, शफीक रचभरे, अकबर खान पठाण, जावेद मुजावर, सलीम शिकलगार, प्रा. युनूस शेख, महिबूब पटेल, सिकंदर सरोडगी, अल्लाबक्ष सय्यदखान व व्यवस्थापक नवाझ लालकोट यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकबरखान पठाण यांनी केले तर आभार अॅड. आरिफ शेख यांनी मानले. राष्ट्रगीताने या सोहळ्याची सांगता झाली.
