खून खटल्यात निर्दोष आरोपीने पोलीस अधिकाऱ्यांविरुध्द केलेला खटला फेटाळला

shivrajya patra
                                                         (संग्रहीत छायाचित्र)

सोलापूर : खूनाच्या आरोपावरुन अटकेतील आरोपीने निर्दोष सुटल्यानंतर खटल्याचे तपास अधिकारी व फिर्यादीविरुध्द न्यायालयात खटला दाखल केला होता. निर्दोष सुटलेल्या आरोपीने तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुध्द व फिर्यादीविरुध्द न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्याची ही पहिलीच घटना होती, त्या याचिकेची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचेसमोर होऊन त्यांनी निर्दोष सुटलेल्या आरोपीची याचिका फेटाळून लावत न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. 

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, खूनाच्या गुन्ह्यात झालेल्या अटकेमुळे व खटल्यामुळे झालेली बदनामी, नावलौकिकाचे झालेले नुकसान याबद्दल तपास करणारे पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यात फिर्यादी दिलेल्या संबंधित आरोपीला (फिर्यादीस) इंडियन पिनल कोड १८२ (एखाद्या सरकारी व्यक्तीला खोटी माहिती देणे जेणेकरून दुसऱ्याला इजा पोहोचावी २११ म्हणजे खोटा खटला करणे जेणेकरून दुसऱ्याला त्रास व्हावा ४२७ म्हणजे दुसऱ्याच्या मालमत्तेचे नुकसान करणे ४९९, ५०० म्हणजे दुसऱ्याची बदनामी करणे या आरोपाखाली शिक्षा व्हावी, म्हणून न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल केला होता. हा खटला न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला होता. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निकालाविरुध्द आरोपीनं सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

खून खटल्यातील निकालपत्रात न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या आरोपीला खोटेपणाने गुंतवले आहे, असे नमूद केलेले नाही. आरोपीस सत्र न्यायालयाने संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडले आहे. त्यामुळे आरोपीस खोटेपणाने गुंतवले आहे, असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद तपास करणारे पोलीस अधिकारी व खून खटल्यातील मूळ फिर्यादीतर्फे न्यायालयात करण्यात आला. 

या प्रकरणी पोलीस अधिकारी व खुन खटल्यातील मूळ फिर्यादीतर्फे  ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. प्रणित जाधव यांनी काम पाहिले. 

To Top