"सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया, चला आपण लोकन्यायालयाच्या मार्गाने जाऊया"
सोलापूर : राज्य विधी सेवा प्राधिकरण, यांचे निर्देशानुसार सन 2025 सालातील पहिले राष्ट्रीय लोकअदालत दि. 22 मार्च 2025 रोजी सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयात आयोजित करण्यात आलेले आहे.
या लोकन्यायालयात ई-चलनाच्या प्रकरणात एस.एम.एस. द्वारा वाहनधारकांच्या मोबाईलवर नोटीसा पाठविले जात आहेत. सदर चलनानुसार नोटीसमध्ये नमूद लिंकवर ऑनलाइनद्वारे चलनाची रक्कम भरता येऊ शकते. तसेच महा ट्राफिक या अॅपवरसुध्दा ही रक्कम भरता येऊ शकते.
या व्यतिरीक्त महाराष्ट्रातील कोणत्याही जवळच्या वाहतूक शाखेमध्ये जाऊन सदर रक्कम भरता येऊ शकते. धनादेश न वटलेल्या फौजदारी प्रलंबित प्रकरणांमध्ये धनादेशाची थोडी रक्कम भरुन प्रकरण निकाली काढता येणे शक्य होणार आहे. धनादेशाची रक्कम एक रकमी देता येणे शक्य नसल्यास ठरलेल्या रक्कमेचे हप्ते बांधून घेणे शक्य होणार आहे. काही रक्कम लोकअदालती दिवशी देवून उर्वरीत रक्कमेबाबत तडजोड हुकुमनामा करणे व संपुर्ण फौजदारी प्रकरण निकाली निघणे शक्य होणार आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत-जास्त पक्षकारांनी आपाली प्रकरणे तडजोडीने मिटवून लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा यांनी केलं आहे
लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुध्द अपील नाही. एकाच निर्णयात कोर्ट बाजीतून कायमची सुटका होते.
लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समझोतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार. लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटूताही निर्माण होत नाही. न्यायालयाच्या हुकुमनाम्याप्रमाणेच लोकन्यायालयात निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होते. लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते.