सोलापूर : दररोजच्या टाळाच्या माध्यमातून रियाज घेतल्यामुळेच मुले चांगल्या प्रकारे वादन करु लागली आहेत. मी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रमाच्या निमित्तानं फिरतो, परंतु दररोज रियाज मुलांकडून करुन घेणारी श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था ही एकमेव असली पाहीजे. ही संस्था सुरु झाल्यापासुन निराळे वस्ती, जुनी पोलिस लाईन परिसरातील अनेक नगरात वारकरी संप्रदायाला चांगली उर्जा मिळाली आहे, असं प्रतिपादन इंगळे महाराज यांनी केले.
श्री संत सावता महाराज वारकरी मृदंग वादन प्रशिक्षण संस्था सोलापूर आयोजित पखवाज साधना हा कार्यक्रम यश नगरातील वै. राजुबाई जांभळे सभागृहात पार पडला. यश नगरमध्ये गत वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने आयोजित पखवाज साधना कार्यक्रमात मार्गदर्शन करताना इंगळे महाराज बोलत होते.
या मृदंग वादन संस्थेकडून वारकरी भजन, हरिपाठ, किर्तन यासाठी लागणारे वादन प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर मुला-मुलींना वारकरी पाऊल शिकविले जातात. मुलांच्या सोबत मुलींनाही प्रशिक्षण दिले जाते.सध्या ३५ विद्यार्थी ह. भ. प. अनिकेत जांभळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहेत.
सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ०६ ते रात्रौ ०९ वाजेपर्यंत वेगवेगळ्या गटाचे टाळ वाजवून पखवाज रियाज मोफत घेतला जातो. संस्थेच्या प्रथम वर्षपूर्ती निमित्ताने या वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम जांभळे यांनी केले.
यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज स्तुती पोवाडा, रामकृष्ण हरि भजन, भगवान शंकराचे स्तवन, सांप्रदायिक टाळ पखवाजाच्या साथीने सादर करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या मुळेच संप्रदाय टिकला, असं मानलं जातं. वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान म्हणून भगवान शंकरांकडे पाहिले जाते.
'हरि हरा भेद ! नाही नका करु वाद !!' हरि हरामध्ये भेद नाही, म्हणूनच शंकर भगवान स्तुती गाऊन प्रत्यय दिला. त्याच बरोबरीने प्रभू रामचंद्राचे हिंदी भजन गाऊन त्या सोबत पखवाज वादन केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज, ह. भ. प. भागवत महाराज चवरे, ज्योतीराम चांगभले महाराज, ज्ञानेश्वर सपाटे, शेखर फंड यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. संयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पंढरपूरचे ह. भ. प. भागवत महाराज चवरे यांनी संस्थेच्या चालत असलेल्या कार्याचे कौतूक केले आणि शुभाशीर्वाद दिला. या कार्यक्रमात १२ मुली व २३ मुले सहभागी होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुकाराम लोखंडे, अविराज जांभळे, संजय केसरे, सचिन भोसले यांनी परिश्रम घेतले.