सोलापूर : निवडणुकीत विरोधी पक्षाचा प्रचार करून लय पुढारपणा करत होता, असे म्हणून झालेल्या बाचाबाचीतून एका तरूणावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना गांधीनाथा रंगजी शाळेसमोर रविवारी मध्यरात्रीनंतर घडलीय. बालाजी सुरेश भिंगारे (वय-३२ वर्षे, रा. घर नं. ७४ मराठा वस्ती, भवानी पेठ) असं या सशस्त्र हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नांव आहे. याप्रकरणी ०८ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्राणघातक हल्ल्याने 'कोयता' पुन्हा एकदा चर्चेत आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रस्थानी सत्तेवर असलेल्या पक्षाचा प्रचार केल्याचे कारण पुढे करून तुला लय मस्ती आली आहे का तुला बघून घेतो, असे म्हणून ऋतिक भिंगारे याने मध्यरात्रीपूर्वी बालाजी भिंगारे यास शिवीगाळी केली.
त्यानंतर बालाजी भिंगारे व त्याचा आत्ते भाऊ अमोल कुंदुर हे चहा पिण्याकरीता २३.४५ वा राहते घराकडून शिवाजी महाराज चौकाकडे दोन दुचाकीवर बसून गेले. ते १२.३० वा. च्या सुमारास चहा पिऊन परत घराकडे जात असताना ऋतिक भिंगारे व अन्य साथीदारांनी हातात लोखंडी कोयता घेऊन त्याचा धाक दाखवून उभयतांना अडवले. अवघ्या दोन-तीन दिवसांपूर्वी कोयत्याने हल्ला करून तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना हा प्रकार घडले आणि कोयता पुन्हा चर्चेत आला.
त्यावेळी ऋतिक भिंगारे याने 'तुला लय मस्ती आली आहे, तुझी वाटच बघत होतो, आता तुला खल्लास करतो' असे म्हणत शिवीगाळी करत त्याच्या हातात असलेल्या कोयत्याने डोक्यात मारत असताना बालाजीने स्वतःच्या बचावासाठी डावा हात पुढे केल्याने डाव्या हातास गंभीर दुखापत होऊन हाड मोडले. त्यांनतर त्याच्यासोबत असलेल्या इतरांनी मिळून बालाजी व त्याचा नातेवाईक कुंदुर यास काठीने व लोखंडी रॉडने सर्वांगास मारहाण केली.
याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलिसांनी ऋतिक भिंगारे, यश भिंगारे, तुषार भिंगारे, संतोष भिंगारे (सर्व रा. काशी कापडी गल्ली प. मंगळवार पेठ सोलापूर) व त्यांच्यासोबत अनोळखी चार इसमांविरुध्द भादवि ३२६, ३२४, ५०६, ५०६, १४३, १४७, १४९ मपोका ३७(१) (३) सह भा. हत्यार का ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. सपोनि गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.