Type Here to Get Search Results !

आता... संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान डीबीटीमार्फत वाटप


सोलापूर : शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा १, ५०० रुपये अनुदान दिले जाते.  हे अुनदान लाभार्थ्यांना  तहसिल स्तरावरून  बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली जाते.  मात्र आता थेट डीबीटीमार्फत  पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरीत केले जाणार आहे.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी  यापूर्वी तहसिलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानूसार निधी दिला जात आहे, तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे. परंतु आता संगायो  व श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान बँकेच्या खात्यावर थेट डीबीटीमार्फत मिळणार आहे.  त्यासाठी संगायो निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

याबाबत गावस्तरावर तलाठ्यांना आवश्यक सुचना देण्यात आल्या आहेत. संगायो व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी  हयात प्रमाणपत्र , बँक पासबुक ,आधार कार्ड मोबाईल क्रमांक इ. आवश्यक कागदपत्रे संबंधित तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी यांचे कडे  १५ जून २०२४ पर्यंत जमा करावेत. जे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी.

विशेष सहाय्य योजनेचे लाभर्थी  हे अनुदानापासून हे वंचित राहू नये यासाठी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे संबंधित  तहसिल कार्यालयाचे  संजय गांधी शाखा  अथवा गाव तलाठी  यांचे कडे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासन यांचे कडून करण्यात  येत आहे. 

आवश्यक कागदपत्रे  :

हयात प्रमाणपत्र,

आधारकार्ड छायांकित प्रत, 

बँकेचे पासबूक छायांकित प्रत, 

मोबाईल नंबर (मोबाईल नंबर व आधारकार्ड त्या बँकेच्या खात्याला लिंक केला असेल त्या बँक खात्यात सदर अनुदान जमा होणार आहे.),

शिधापत्रिका छायांकित प्रत, 

दिव्यांग प्रमाणपत्र इ.