Type Here to Get Search Results !

मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रूपेरी पडद्यावर



शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'संघर्षयोद्धा' २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा 'संघर्षयोद्धा' मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या २६ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता, आता या चित्रपटाच्या प्रमोशनला ही अंतरवाली सराटी येथूनच सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सोमवारी सकाळी परिषदेत सांगितले. 

सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. "संघर्षयोद्धा" हा माझा पहिलाच बायोपिक आहे, असं शिवाजी दोलताडे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.


याआधी मी मुसंडी, मजनू, धुमस असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनवणे, हे जरा सोपे असते, कारण त्यात आपण काही गोष्टी या जोडू शकतो, परंतु एखाद्या चालू घडामोडींवर चित्रपट तयार करणे तेवढेच कठीण असते. त्यामुळे हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. मला स्वतः मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या टीमने मला वेळोवेळी योग्य ती मदत केली, हे मी नक्कीच नमूद करू इच्छितो. त्यामुळेच हे शिवधनुष्य मी पेलू शकलो, असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले.

संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहचलेले आहेत. त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केला आहे आणि त्यांची सुद्धा मला तेवढीच साथ लाभली आहे.   त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे आणि तुम्ही हा चित्रपट नक्कीच जाऊंन पहाल अशी मला खात्री असल्याचे अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितले.     



मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष हा खडतर असून, संपूर्ण जगाला समजावा, यासाठी मी या चित्रपटाची निर्मिति करण्याचा निर्णय घेतला. केवळ व्यक्तीसाठी न लढता समाजासाठी आज ते लढत आहेत, ही छोटी गोष्ट नाही. त्यांनी आजवर अनेक उपषोण केली, हार मानली नाही. माझे मी भाग्य समजतो की, या चित्रपटाची निर्मिती करण्याची सुवर्णसंधी मला मिळाली, असे चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीज़रला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला होता, त्यानंतर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजातील हृदयाला भिडणाऱ्या "उधळीन जीव..." या गीताने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे.

""""""""""""""

... यांच्या आहेत प्रमुख भूमिका !

या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

""""""""""""""

... ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली : अभिनेते रोहन पाटील

आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून मी भूमिका मी केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारलीय. मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा मला साकारायला मिळाली. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली आहे, असं अभिनेते रोहन पाटील यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.