मन्नेवारलू व महादेव कोळी जमातीला द्यावं प्रमाणपत्र : डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे
नांदेड : यंदाच्या निवडणूक प्रचारात अनुसूचित जमाती मन्नेरवारलु व महादेव कोळी संवाद मेळाव्याचे आयोजन करणार, मागच्या निवडणुकीत सुद्धा असेच मेळावे भरविण्यात आले होते. त्यात आश्वासनाची खैरात झाली होती, नेहमीच मागासवर्गीयांच्या कोपऱ्याला गूळ लावण्याचे काम हे राजकारणी करीत आले आहेत, हे वास्तव सत्य युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी मांडलंय.
उच्च शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी किती यातना भोगावे लागत आहेत, याचा विचारही माय-बाप जनतेने करावा. गेल्या पाच वर्षापासून मन्नेवारलू व महादेव कोळी जमातीबद्दल कोणत्याही नेत्याला पुळका आला नाही. आज निवडणुकीच्या तोंडावर स्वतःची पोळी भाजण्यासाठी समाजाचा एवढा पुळका कशासाठी, असा संतप्त सवाल डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी उपस्थित केलाय.
या मुद्यावर सकारात्मकता दाखवून समाजातील वरच्या पातळीवरील नेते मंडळींनी समाजाच्या उद्धारासाठी एक पाऊल पुढे येण्याची नितांत गरज आहे. आपल्या स्वार्थासाठी समाजाला कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधले जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. मागच्या निवडणुकीत दिलेले आश्वासनाची पूर्तता झाली आहे का ? याचाही सखोल विचार होणे अगत्याचं आहे.
त्यावेळी दिलेल्या आश्वासनाचं काय झालं, हा प्रश्न राजकीय नेतेमंडळींना विचारण्याची गरज आहे. त्यांची आजपर्यंत समाजाबद्दल काय भूमिका घेतली, हे सर्वानाच माहिती आहे. संवाद मेळावे भरल्याने न्याय मिळत नसतो तर त्यासाठी त्याचा पाठपुरावाही करण्याची गरज आहे. गरीब कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार आहेत, या वर्गात संताप खदखदतो आहे.
अधिकाऱ्यांची पोरं अधिकारी होत आहेत. मग कुठे समाजात एकोपा आहे. मागासवर्गीयांचा विकास करू, असे वल्गना करणारे नेते तर पुढील निवडणुकीपर्यंत दिसत नाहीत. कोणत्या आमदाराने व खासदारांनी कुठल्यातरी मतदारसंघात मन्नेरवारलु, महादेव कोळी या जमातीचे जातीचे प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र सुरू करण्यास तिथल्या एसडीएमला सांगितले किंवा त्यांच्याबरोबर बैठक घेतली का? प्रमाणपत्र सुरू करण्यास भाग पाडले असे झाले आहे काय? त्यासाठी प्रयत्न केले आहेत काय? हा प्रश्न सर्व समाजबांधवांनी विचार करण्याची गरज आहे, असं डॉ. लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटलं आहे.
उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही वैधता प्रमाणपत्र देत नसल्याने कारणाने अनेक जणांना संधीला मुकावं लागत आहे. अनेकांच्या पदोन्नती रोखून गेल्या आहेत, पेन्शन मंजूर केल्या जात नाही. मग का आणि कुणासाठी मतदान करायचे, असा या दोन्ही समाजाचा सवाल आहे.
आपण विरोध कुठल्याच पक्षाला करायचं नसून पण जो पक्ष समाजासाठी झिजणार आहे, न्याय मिळवून देणार आहे, अशाच उमेदवाराला मतदान करावं, मतदानही शंभर टक्के झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉ. कलमुर्गे यांनी केलं आहे.