Type Here to Get Search Results !

अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच; आ. देशमुख यांच्या पाठपुराव्याला अखेर यश


सोलापूर : अन्न उत्कृष्टता केंद्र अखेर सोलापुरातच राहणार असून याबाबतचा शासनाने नवीन जीआर नुकताच प्रसिद्ध केला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी हे केंद्र सोलापुरातच राहावे, यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता तसेच अधिवेशनात आवाज उठवला होता. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं आहे.

अन्न उत्कृष्टता केंद्र हे बारामतीकडे हलवण्यात आले होते. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात मोठा रोष पसरला होता. हे केंद्र सोलापुरातच राहावे, यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. सोलापूर जिल्हा हा भरडधान्याची मोठी बाजारपेठ आहे. ज्वारीचे कोठार म्हणून देखील प्रसिद्ध आहे. 

सोलापूर जिल्ह्यात बाजारपेठ व दळणवळणाची उत्तम सुविधा असल्यामुळे आयात-निर्यात प्रक्रिया देखील सुलभ होईल, याचा विचार करता तातडीने २४ नोव्हेंबर चे परिपत्रक रद्द करून अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात व्हावे, यासाठी आ. सुभाष देशमुख यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.अधिवेशात देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. 

अखेर १३ मार्च रोजी बारामती येथील केंद्र रद्द करून सोलापूर येथेच केंद्र सुरु करावे, असा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे.

....चौकट....

केंद्रासाठी जागा मिळवून देणार  : आ. देशमुख

अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच झाल्यास त्याला चांगला वाव आहे. जिल्ह्यात दळणवळणाची व्यवस्थाही उत्तम आहे. त्यामुळे सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. लवकरच या केंद्रासाठी जागा मिळवून देणार असल्याचंही आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.