Type Here to Get Search Results !

खिलाडू वृत्तीमुळे माणसाचे आरोग्य चांगले राहते : मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे



          जिल्हा परिषद क्रिडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

सोलापूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचा ताण कमी करण्यासाठी क्रीडा स्पर्धांची व सांस्कृतिक कार्यक्रमाची गरज आहे. खिलाडू वृत्तीमुळे माणसाचे आरोग्य चांगले राहते तर सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कलागुणांना वाव मिळतो, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी म्हटले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाने या क्रीडा स्पर्धेचा समारोप होणार आहे.

शनिवारी, या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नेहरूनगर येथील मैदानावर जिल्हा क्रीडा अधिकारी जितेंद्र पवार यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी ११ तालुक्याच्या पंचायत समिती व मुख्यालयाचा एक अशा १२ संघांनी मैदानावर संचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. 

कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी व प्रशासनाधिकारी अविनाश गोडसे यांच्या हस्ते क्रीडाज्योत आणण्यात आली. सीईओ आव्हाळे यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केल्यानंतर उपस्थित खेळाडूंनी शपथ घेतली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे बोलत होत्या.



या निमित्ताने जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार एकमेकांसमोर क्रिकेटसाठी समोरासमोर आले, जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे... ! उद्घाटनाचा मैत्रीपूर्ण मात्र अटीतटीचा सामना जिल्हा परिषद अधिकारीविरुद्ध जिल्हा परिषद पत्रकार संघ यांच्यात झाला. सामन्याच्या उद्घाटनावेळी प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या गोलंदाजीवर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी जोरदार फलंदाजी केली. 

पत्रकार संघाने नाणेफेक जिंकल्यावर कर्णधार प्रशांत कटारे यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. पत्रकार संघातर्फे कर्णधार कटारे, अकबर बागवान, शेखर गोतसुर्वे, विनोद कामतकर, संदीप येरवडे, आप्पा पाटील, अमोल साळुंखे, मनोज भालेराव, इम्रान सगरी, अविनाश गायकवाड यांनी जोरदार फलंदाजी केली. 

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष बळीराम सर्वगोड, राजकुमार सारोळे यांनी संघाला प्रोत्साहित केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्या गोलंदाजीवर संदीप येरवडे तर महिला बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या गोलंदाजीवर कर्णधार कटारे यांनी धुवॉधार फलंदाजी केली. पत्रकार संघाने ०७ षटकात ६८ धावांचं लक्ष्य ठेवलं.

जिल्हा परिषद पत्रकार संघाचं आव्हान अधिकारी संघाने ०१ षटक व ०८ गडी राखून संपुष्टात आणले. जिल्हा परिषद अधिकारी संघातर्फे सलामीचे कर्णधार तथा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर व पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक संचालक अमोल जाधव यांनी जोरदार खेळी केली. 



भालेराव यांच्या गोलंदाजीवर संदीप येरवडे यांनी आव्हानात्मक झेल घेत जाधव यांना बाद केले. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मैदान मारले. त्यांनी चौकार मारून अधिकारी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, सुनील कटकधोंड, अविनाश गोडसे यांनी क्षेत्ररक्षण जोरदार केले. सामनावीर म्हणून अमोल जाधव यांना घोषित करण्यात आले. 

जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार यांच्यामधील हा मैत्रीचा सामना अतिशय चर्चेचा ठरला. सीईओ आव्हाळे यांनी शेवटपर्यंत सामना पहात सर्वच खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्याही खिलाडूवृत्तीचे कर्मचाऱ्यांमधून कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन संजय सावंत व पवार सर यांनी केले.

जिल्हा परिषदेत पत्रकार आणि अधिकारी यांच्या बऱ्याच काळानंतर असा सामना झाल्याने चर्चेचा विषय झाला.जिल्हा परिषदेचे अधिकारी व पत्रकार यांच्यात शर्थीची झुंज झाली, मात्र एरव्ही बातमीचे मैदान मारणारे पत्रकार क्रिकेटच्या मैदानात अधिकाऱ्यांकडून एक पाऊल मागे राहिले.