सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंगळवारी, १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वा. पोलीस आयुक्तालयात शांतता समिती कमिठीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी सदस्य, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, आर टी ओ चे अधिकारी, महावितरण चे अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांची संयुक्तपणे निमंत्रित करण्यात आलं होतं. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त एम. राजकुमार होते.
शांतता कमिठीच्या बैठकीची प्रस्तावना पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. गुरुवारी १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यानच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. सोमवारी, १९ फेब्रुवारी रोजी मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविणेबाबत सूचना देण्यात आल्या.
सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरेंची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा २/३ भाग मोकळा सोडावा. मोकाट जनावरांपासुन मुर्ती/फोटोस धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचे पावित्र राखावे, देखावे, रोषणाई पाहण्यास येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांकरीता स्वतंत्र रांगेची सोय करावी, प्रवेशाकरीता आणि बाहेर जाण्यास स्वतंत्र गेट असावे. मंडळांकडुन जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास त्यामुळे गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंदी द्यावी. तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर जनजागृती करावी.
सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. मंडाळांनी महावितरण विभागाकडुन अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी, जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्ट सर्कीट होऊन इजा अथवा धोका होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर टी ओ कडून तपासणी करावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. मिरवणुक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये. इतर धर्मांच्या भावना दुखावणार नाही व तसेच मंडळाने स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुर्तीसमोर स्वयंसेवक सतत हजर राहतील, व मुर्तीची देखभाल करतील, याची पुरेपुर काळजी घ्यावी, असेही यावेळी सूचित करण्यात आलं.
सोशल मिडीयावरुन काही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळानी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्यावी. तसेच ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्यानंतर सूचनेचे संबंधित महानगर पालिका, महावितरण, आर टी ओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा पाहून समस्या सोडविण्यात येतील, असे सांगितले.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणींचे निरसण केले. उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदूषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे, मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल. शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत. तसेच या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता पोलीस घेतील, अशी ग्वाही दिली. शेवटी बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.
या बैठकीस पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अशोक तोरडमल (विभाग-१), अजय परमार (विभाग-२), राजु मोरे (वाहतुक शाखा), श्रीमती, प्रांजली सोनवणे, (गुन्हे शाखा), नियंत्रण कक्ष, तसेच सोलापूर महानगर पालिकेकडील अतिरीक्त आयुक्त कारंजे, आर टी ओ चे श्रीमती. अर्चना गायकवाड, महावितरण चे आशिश मेहता तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, व शांतता कमिटीचे सदस्य व पत्रकार बंधु उपस्थित होते.