Type Here to Get Search Results !

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद



केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : जिल्ह्यात २३ नोव्हेंबर २०२३ पासून विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत विविध केंद्रीय योजनांची माहिती शहरी व ग्रामीण भागात देण्यासाठी चित्ररथ गावोगावी व शहरात फिरत आहेत. तरी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती तसेच लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी व प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल विठ्ठल उदमले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांच्यासह अन्य विभाग प्रमुख तर ऑनलाईनद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती.



जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की,  विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत जिल्ह्याच्या शेवटच्या घटकापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी सर्व संबंधित विभागाने केलेल्या सूक्ष्म नियोजनाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे याकडे लक्ष द्यावे. सर्व तालुकास्तरीय यंत्रणांनी चित्ररथ कोणत्या गावात येणार आहे.याबाबतची पूर्वप्रसिद्धी विविध माध्यमांचा वापर करून करावी व चित्ररथ गावात पोहोचल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश त्यांनी दिले.

विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात २३ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ पर्यंत राबविण्यात येत असून या माध्यमातून या कालावधीत एक ही पात्र लाभार्थी केंद्राच्या कोणत्याही योजनापासून वंचित राहणार नाही. यासाठी प्रत्येकाने जबाबदारीपूर्वक काम करावे. केंद्र शासनाकडून या यात्रेच्या अनुषंगाने वेळोवेळी आढावा घेतला जात असून, सोलापूर जिल्हा ही योजना राबवण्यात राज्य व देश पातळीवर प्रगतीपथावर राहील, यासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुख आणि त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांकडून उत्कृष्ट काम करून घ्यावे, असेही त्यांनी सूचित केले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आठ चित्ररथाच्या माध्यमातून केंद्रीय योजनांची प्रचार व प्रसिद्धी सुरू असून प्रत्येक चित्ररथ प्रति दिवस दोन गावात जाऊन योजनांचा प्रसार करत आहे. त्याचप्रमाणे पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विहित कालावधीत चित्ररथाच्या माध्यमातून एक हजार एकोणीस ग्रामपंचायत मध्ये पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के केंद्रीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केलेले असून त्यानुसार अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.

यावेळी आयुष्यमान भारत, सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पोषण आहार योजना, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री स्व निधी योजना व अन्य योजनांचा आढावा जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शन सूचना दिल्या.