सोलापूर/१६ नोव्हेंबर : प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पीकविमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका व बाजरी पीकांसाठी पात्र विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसान भरपाई रक्कम नोव्हेंबरच्या दुस-या आठवड्यापासून वितरीत केले जाणार होते. परंतु विमा कंपनीने सोयाबीन अग्रीमाबाबत विभागीय आयुक्ताकडे अपील दाखल केले होते. त्या अपिलाच्या सुनावणीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीचे सर्व मुद्दे खोडून काढल्याने विमा कंपनीने जिल्ह्यातील सोयाबीन पीक विम्याच्या ०१ लाख १६ हजार १७३ अर्ज भरणाऱ्या ८८ हजार ३५२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट ८० कोटी ७८ लाख रुपये मंगळवारी, १४ नोव्हेंबर रोजी जमा केल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२३ अंतर्गत सोलापूर जिल्हयात माहे ऑगस्टमध्ये पावसातील खंडामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता लक्षात घेता प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील ९२ महसूल मंडळे व ०८ तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देणेबाबत पिक विमा कंपनीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हास्तरवर झालेल्या सात ते आठ बैठकांमध्ये तसेच लेखी पत्राद्वारे वांरवार सूचना देऊन तसेच अपर मुख्य सचिव कृषि विभाग, आयुक्त कृषि महाराष्ट्र राज्य यांचेशी दुरध्वनीद्वारे तसेच कृषि मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सोलापूर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली.
त्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाठपुरावा केला. तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पिक विमा अग्रीमबाबत पाठपुरावाही केलेला होता. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी ही पीक विमा अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शासन व विमा कंपनीकडे पाठपुरावा करत होते.
जिल्हा प्रशासन व सर्व लोकप्रतिनिधी यांनी विमा कंपनीकडे केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन विमा कंपनीने सोयाबीन, बाजरी व मका पिकासाठी आगाऊ रक्कम मंजूर केली. परंतु विमा कंपनीने सोयाबीन अग्रीम बाबत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाच्या विरोधात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्या अपीलावर विभागीय आयुक्त यांनी सुनावणी घेतली.
त्या सुनावणीमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमा कंपनीचे सर्व मुद्दे खोडून काढल्याने विमा कंपनीने मंगळवारी, १४ नोव्हेंबर रोजी ८८ हजार ३५२ लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर ८० कोटी ७८ लाख रुपये सोयाबीन नुकसान भरपाई अग्रीम जमा केलेले आहे.
उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे अग्रीम रक्कम जमा झाल्याची माहिती श्री. गावसाने यांनी दिली.