मुंबई/२६ : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा ६७ वा वर्धापन दिन सोहळा, ०३ ऑक्टोबर रोजी तेलंगणा राज्यातील हैद्राबाद मध्ये नामपल्ली रेल्वे स्टेशन जवळील मुकररामजाही रोडवरील एक्झिहीबिशन ग्राउंडवर आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान दिले, त्यांच्या बुद्धीतून महान विचारातून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना निर्माण झाली. त्यांनी खुले पत्र लिहून रिपब्लिकन पक्षाची संकल्पना घटना लिहिली. त्यानुसार ०३ ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची ऐतिहासिक स्थापना झाली. त्यानुसार आम्ही दरवर्षी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन साजरा करतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला रिपब्लिकन पक्षाचा ऐतिहासिक वारसा आम्ही चालवत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन संकल्पनेचा अभिमान आहे. ज्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे,श्रद्धा आहे. ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन विचार पटतो, त्या सर्वांनी भीमसैनिकांनी रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यास जरूर उपस्थित राहावे, असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
ज्यांनी कोणी रिपब्लिकन नाव आपल्या पक्षाच्या बॅनरमधून पुसले असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकारांच्या रिपब्लिकन संकल्पनेला तसूभर ही फरक पडला नाही. आम्ही अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत रिपब्लिकन राहू, आम्ही कधीही आमच्या पक्षाचे नाव बदलणार नाही. रिपब्लिकन संकल्पना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना असून रिपब्लिकन पक्षाला आम्ही देशभर पोहोचवले आहे.
नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे २ आमदार निवडून येऊन तिथे रिपाइं चा निळा झेंडा फडकला आहे. लक्षद्विप, पोंडीचेरी, केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देशातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशात रिपब्लिकन पक्ष कार्यरत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन वारसा आम्ही घेऊन देशभरात गावागावात निळा झेंडा फडकवीत आहोत, असे मनोगत ना. रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.