सोलापूर : पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा अनाहुत सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिला. बावनकुळे यांच्या व्यक्तव्याचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून अशा बेताल व्यक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांचा अवमान आहे. ज्यामुळे प्रामाणिक पत्रकारांच्या भावना दुखावल्या आहेत, याप्रकरणी बावनकुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी एका निवेदनाद्वारे केलीय.
बावनकुळे यांच्या उपस्थितीत रविवारी, २४ सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुथरचना आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळायच्या जबाबदाऱ्या या विषयावर बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार-पाच पत्रकार आहेत, त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला... ! त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच.
महाविजय २०२४ पर्यंत बुथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही, याची काळजी घ्या, सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, याची काळजी घ्या, असे बावनकुळे म्हणाले होते. भाजपा प्रदेश अध्यक्ष पदावर काम करत असताना राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत बेताल बोलणे बावनकुळे यांना अशोभनीय आहे.
पत्रकारांचा अवमान सहन केला जाणार नाही
सुसंस्कृतपणाचा टेंभा मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीने महाराष्ट्रातील पत्रकारांच्या बाबतीत 'चहा-ढाबा' असे शब्द वापरणे, अयोग्य आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये संतापाची भावना उसळली आहे, बावनकुळे यांचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे, अशी तीव्र भावना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी व्यक्त करून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचा अवमान सहन केला जाणार नाही, असंही यशवंत पवार यांचे म्हणणे आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यावर कारवाई करा, म्हणून पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख, शहर समन्वयक श्रीकांत कोळी, अकबर शेख, मेहबूब कादरी उपस्थित होते.