‘आनंदाचा शिधा' वेळेत पोहोचवा : अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

shivrajya patra

औरंगाबाद/२७: गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत 'आनंदाचा शिधा' वितरणाचा निर्णय शासनाने घेतला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गणेशोत्सवाच्या आधी आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा व  त्यासाठी काटेकोर नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी येथे दिले.

मंत्री छगन भुजबळ हे औरंगाबाद येथे आले असता, त्यांनी आज पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा आढावा घेतला. बैठकीस उपायुक्त पुरवठा गव्हाणे ,जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, सहा. पुरवठा अधिकारी सोनाली जोंधळे,सहनियंत्रक वजनमापे सुरेश चाटे, उपनियंत्रक रमेश दराडे, सहायक नियंत्रक एस.वाय.मुंडे,डी.व्ही गावडे आदी उपस्थित होते.

औरंगाबाद विभागात आठही जिल्हे मिळून गौरी गणपती उत्सवानिमित्त द्यावयाच्या आनंदाचा शिधा संदर्भात माहिती देण्यात आली. विभागात अन्न धान्य वितरणाची सरासरी आकडेवारी लक्षात घेता आनंदाचा शिधा साठी ३२ लाख ७६ हजार ३८७ शिधाजिन्नस संचाची मागणी नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. विभागातील गोदामांच्या सद्यस्थितीबाबत, शिवभोजन देयकांच्या अदायगीबाबत आढावा घेण्यात आला.

भुजबळ म्हणाले की, गोदामांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून १० लाख रुपयांपर्यंतच्या दुरुस्ती कामासाठी निधी मिळावा, अशी तरतूद करण्यात येईल.

शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखान्यांमध्ये उसाचे अचूक मोजमाप व्हावे यासाठी बनविण्यात आलेल्या प्रमाणित संचालन कार्यप्रणालीचे काटेकोरपणे पालन करन्याचे निर्देश यावेळी भुजबळ यांनी वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.या प्रणालीनुसार साखरकारखान्यांमध्ये वापरात असणाऱ्या वे ब्रीज मध्ये डिजीटल लोड सेल बसविण्यात यावा व या हंगामापासून प्रमाणित संचालन कार्यप्रणालीची अंमलबजावणी करावी, असे निर्देश भुजबळ यांनी दिले. तसेच विभागातील प्रश्न आणि अडीअडचणींची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
To Top