नान्नज येथे मानव आणि वन्यजीव संघर्षाबाबत पार पडला जनजागृती कार्यक्रम
सोलापूर / 27 : मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांमध्ये कायदेविषयक जनजागृती निर्माण करण्याबरोबरच वन्यजीवांचे संरक्षण, तसेच संघर्षग्रस्त नागरिकांसाठी शासनाच्या उपलब्ध योजनांची माहिती तळा-गाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या विशेष योजनेनुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे मानव आणि वन्यजीव संघर्षाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्य व उपलब्ध विधी सेवांबाबत युवा विधिज्ञ चैतन्य केंगार यांनी माहिती दिली. वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्षाबाबत वन विभागाची भूमिका व विविध उपाययोजनांची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रोहितकुमार गांगर्डे यांनी दिली.
मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्षातील पीडितांसाठी उपलब्ध विशेष योजनांबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण, नागरिकांनी घ्यावयाची दक्षता, वन्यजीवांशी संघर्ष झाल्यास उपलब्ध कायदेशीर मदत तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रियेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी वन्यजीवांशी संबंधित समस्या, कायदेशीर तरतुदी आणि उपलब्ध मदतीबाबत विविध प्रश्न विचारले. न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे व रोहितकुमार गांगर्डे यांनी प्रश्नांची उत्तरे देऊन नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमास स्थानिक नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.
***
