अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली असून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत 30 मे पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. “मंडपात नाही, तर भर रणरणत्या उन्हात उपोषण करणार... मेलो तर मेलो पण आता मागे हटणार नाही,” असा थेट इशाराच त्यांनी सरकारला दिला.
अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. “कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकच आहेत. सरकारला फक्त मराठ्यांची मते पाहिजेत, पण आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय घ्यायची वेळ आली की टाळाटाळ केली जाते,” असा आरोप त्यांनी केला.
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेटच्या आधारे नोंदी असलेल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देणे, आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या समाज बांधवांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देणे, तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेणे या मागण्यांचा समावेश आहे. “सरकारने वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी केली नाही,” अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांचे विरोधक नाही. त्यांनी शंभर टक्के आरक्षण देऊ, असं सांगून समाजात अपेक्षा निर्माण केल्या. अजूनही त्यांच्याकडे मराठा समाजाची मनं जिंकण्याची संधी आहे. त्यांनी सर्व मागण्या मान्य करून निर्णय घ्यावा.”
“मराठा समाज हा लढणारा आणि साम्राज्य उभं करणारा समाज आहे. केवळ आश्वासनांवर आता समाज थांबणार नाही. चर्चा खूप झाल्या, आता निर्णय हवा,” असे सांगत त्यांनी सरकारवर दबाव वाढवला.
“विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठा समाजाला ना पाणी मिळत आहे, ना आरक्षण. गोरगरीब मराठा तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. समाजाला न्याय द्यायची वेळ आली की सरकार आखडता हात घेत आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
शनिवारी, 30 मेपासून सुरू होणारे उपोषण अत्यंत टोकाचे असेल, असे स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी कोणत्याही मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत गर्दी करू नये, असे आवाहन केले. “मी समाजासाठी प्रामाणिकपणे लढतोय. उष्माघाताने माझा बळी गेला तरी मी मागे हटणार नाही,” असा भावनिक निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
सरकारकडून चर्चेचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आता फोनवरून कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही चर्चेला कधीच नकार दिला नाही. सरकारलाच उत्तर द्यायला जागा उरलेली नाही. आम्ही अल्टिमेटम दिला होता, पण मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आता 30 मेपासून उपोषण अटळ आहे,” असे ते म्हणाले.
दरम्यान, जरांगे पाटील यांच्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
