प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (सल्ललल्ला हो अलैहे व सल्लम) यांनी दिलेल्या संदेशानुसार व कुरआन शरीफमध्येअल्लाहतआला ने सांगितलेल्या निर्देशानुसार व्यक्तीचं या दुनियेतील वास्तव्य हेअल्पकालीन व तात्पुरते आहे. प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावे लागणार आहे. एक दिवस या जगाचा विनाश होणार असून मृत्यू पावलेल्या सर्वांना पुन्हा जागे केले जाणार आहे. तो दिवस कयामतचा दिवस आहे.
या दिवशी प्रत्येकाला दुनियेमध्ये त्याने वास्तव्य काळात केलेल्या बऱ्या-वाईट कार्याचा निकाल दिला जाईल. त्या निकालानुसार ज्याचे पुण्य जास्त असेल तो स्वर्गात (जन्नत) जाईल,ज्याचे पाप जास्त असतील तो नरकात (जहन्नुम) जाईल. तो दिवस लवकरच येणार आहे. म्हणून प्रत्येकाने या दुनियेमध्ये जीवन जगतांना आपल्याला आपल्या प्रत्येक कार्याचा हिशोब द्यावयाचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. सतत चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करावा.
आपण काहीही केले तरी कोण पाहतोय, ही भावना मनातून काढून टाकावी. एक अशी शक्ती ज्याने ही सृष्टी निर्माण केली, ती सर्व काही पाहत आहे. आपल्या दररोजच्या वर्तनाची नोंद ते सतत घेत असतात ही जाणीव मनात ठेवली तर माणसाकडून चुका घडू शकत नाही. जाणते-अजाणतेपणी आपण काही गोष्टी करत असतो.
धार्मिक श्रद्धेपोटी वेगवेगळे सोपस्कार आपण करतो. त्याचबरोबर रात्रीच्या अंधारात, दिवसाच्या उजेडात, एकांतामध्ये नको त्या गोष्टी सुद्धा करीत असतो. आपल्याला वाटते कोणी पाहिले नाही, परंतु तो परमेश्वर सत्तर पडद्यामध्ये सुद्धा केलेले सर्व काही पाहत असतो.
रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी फळांची टंचाई असून फळांचे व्यापारी मनमानी पद्धतीने दर आकारित आहेत. सुकामेव्याचे दर सुद्धा गगनाला भिडले आहेत. कृत्रिम टंचाई निर्माण करून अडचणीत सापडलेल्या लोकांना लुटले जात आहे. पण लक्षात ठेवा, या सर्व पापांची फळे तुम्हाला भोगावी लागणार आहेत. त्यासाठी तयार राहा.
रमजान महिन्याच्या पवित्र पर्वातच इराण, इसराइल-अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. अरब जगतातील अनेक देशांना सुद्धा याचा फटका बसला आहे. एकटा इराण अठरा देशांशी युद्ध लढत आहे. अमेरिकेने जगावर लादलेले युद्ध आहे, याची किंमत प्रत्येकाला चुकवावी लागणार आहे.
मानवाने निर्माण केलेल्या विनाशकारी अस्त्रांचा वापर करून मानवी जात नष्ट करण्याचे पाप केले जात आहे. हा विधवंस जगाला कयामतच्या दिशेने घेऊन जात आहे. (क्रमशः)
