पवित्र रमजान महिन्यांमध्ये धार्मिक ग्रंथ कुरआन शरीफ चे अवतरण पृथ्वीतलावर झालेले आहे. सुमारे साडे तेवीस वर्षांचा कालावधी त्यासाठी लागला. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहू अलैही व सल्लम यांचेवर अल्लाहचे विशेष देवदूत (फरिश्ता)हजरत जिब्रईल अलैहिसलाम हे अल्लाहचा संदेश घेऊन येत असत.
मक्का शहराजवळील गार-ए-हिरा या गुहेमध्ये हजरत पैगंबर प्रार्थना करीत असतांना तेथे हे देवदूत येऊन त्यांना कुरआन मधील आयत वाचून दाखवत होते. हजरत पैगंबर ती पाठ करून घेत व आपल्या अनुयायांना सांगून तिचे लेखन करून ठेवीत होते. अशा पद्धतीने साडे तेवीस वर्षांमध्ये तीस खंडांचा हा दैवी ग्रंथ पृथ्वीतलावर अवतरीत झाला.
रमजान महिन्यांमधील विशेष प्रार्थनेचा भाग म्हणून घराघरातून खूप मोठ्या प्रमाणात महिनाभर कुरआन शरीफचे वाचन केले जाते, त्याला तिलावत ए कुरआन म्हणतात. त्याचा अर्थ समजून घेतला जातो.अल्लाहतआला ला जो संदेश त्यातून अभिप्रेत आहे, तो समजावून सांगण्याचे कार्य कुरआनशरीफचे जाणकार करतात.
कुरआन शरीफ म्हणजे दैनंदिन जीवनाची दैवी घटना आहे. घटनेमध्ये ज्या पद्धतीने नियम, अटी असतात त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने आपण जीवन व्यतीत केले पाहिजे, त्या प्रत्येक बाबीचे सखोल मार्गदर्शन कुरआन शरीफ मध्ये केलेले आहे.
वाईट कृत्य केल्याने त्याचे काय परिणाम होतात, हे सुद्धा त्यात नमूद केले आहे. प्रत्येकाने आपले जीवन सचोटीने जगावे, वागावे, बोलावे आणि चालावे ही शिकवण कुरआन शरीफ मध्ये दिलेली आहे.
दैनंदिन व्यवहारामध्ये कशा पद्धतीने आपण वर्तन केले पाहिजे, या बाबी त्यात सांगितलेल्या आहेत. नातेवाईक, कुटुंब, मित्रपरिवार या प्रत्येकाचे कोण कोणते अधिकार आपल्यावर आहेत, आपले कर्तव्य त्यांच्याप्रति काय आहेत, या बाबी देखील नमूद केल्या आहेत.
आपले जीवन समृद्ध आणि सार्थक होण्यासाठी प्रत्येक माणसाने कशा पद्धतीने वागले पाहिजे, याचेही मार्गदर्शन या दैवी ग्रंथामध्ये केलेले आहे. ज्याने कुरआन शरीफ मधील शिकवण अंगीकारली त्याचे जीवन कारणी लागले, असे समजले जाते.
आपल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब कयामतच्या दिवशी प्रत्येकाला द्यावयाचा असल्याने प्रत्येकाने पापभिरू वृत्तीने वागले पाहिजे, हा मूलतः संदेश कुरआनमध्ये दिलेला आहे.चांगले जीवन जगण्यासाठी कुरआनचा संदेश समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082.
