सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्याच्या भागाईवाडी या गावात जाणारा रस्ता मागील 25 वर्षापासून आडवलेला होता. यामुळे या गावातील नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता. उत्तर सोलापूर चे तहसीलदार निलेश पाटील यांच्या मध्यस्थीने हा अडवलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला. हा रस्ता सुरू करण्यासाठी त्यांनी संबंधित शेतमालक तसेच ग्रामस्थ यांच्यामध्ये सुवर्ण मध्य साधून गावच्या रस्त्याचा प्रश्न सोडवला.
बुधवारी भागाईवाडी येथे समक्ष येऊन तहसीलदार यांनी रस्त्याची पहाणी केली. व शेतमालक व ग्रामस्थांशी समन्वय साधून सुवर्णमध्य काढला. गट नंबर 8 च्या मधोमध असलेला रस्ता याच क्षेत्रातून एका बाजूने जड वहातुकीस सोयीचा ठरेल एवढा म्हणजे 16 फुट तर वळणावर 20 फुट रुंदीचा रस्ता खुला करुन दिला.
हा रस्ता खुला झाल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे. याकामी वडाळा मंडल अधिकारी कन्याकुमारी भोसले, भागाईवाडीच्या ग्राम महसूल अधिकारी वैष्णवी कोंथीबीरे, मोजणी अधिकारी, भुमिलेख अधिकारीसह पोलिस पाटील सजित पाटील यांच्या पथकाने दिवसभर थांबून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर असलेले दगड, झुडपे काढून रस्ता वाहतुक योग्य करण्यासाठी थांबून होते. ***
