सोलापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर माढा शहरातील यु. के. जी. मध्ये शिक्षण घेत असलेल्या पाच वर्षीय छोट्या ध्रुव बालाजी लोहकरे या बालकानं मोठं औदार्य दाखवलंय. त्याचं औदार्य आणि सामाजिक भान संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरलं आहे.
ध्रुव नं आपल्या पीगी बँकेत जमा केलेली रक्कम पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडं सुपूर्द केली. या लहानशा वयातही समाजातील संकटग्रस्त घटकांविषयी असलेली जाणीव आणि मदतीची भावना ही अत्यंत महत्त्वाची आहे, असं सांगत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी ध्रुव चं विशेष कौतुक केले.
ध्रुवचे हे कृत्य बालमनातील संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि उदात्त विचारांचे प्रतीक आहे. संकटसमयी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या बालकाने जिल्हा प्रशासनासह नागरिकांचे मन जिंकलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ध्रुवने दिलेली ही मदत केवळ आर्थिक योगदान नसून संपूर्ण समाजाला एक सकारात्मक संदेश देणारा कृतीशील आदर्श आहे, हे मात्र नक्की !
