सोलापूर : खानदानी दुश्मनीतून दोघांची हत्या तर एकास गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आरोपी राहुल बोराडे व आरोपी सुभाष बोराडे यांच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मृत कृष्णा पाटील व आरोपी बोराडे यांच्यात खानदानी दुश्मनी आहे. आरोपींनी पूर्व वैमनस्यातून कृष्णा पाटील यास जीवे ठार मारण्याचा कट केला व कट रचल्याप्रमाणे कृष्णा पाटील, माणिक सातपुते व सुदाम चव्हाण असे तिघे मोटरसायकलवरून बार्शीकडून ताडसौंदणे गावाकडे जात असताना आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलला समोरून जोरात धडक देऊन खाली पाडून डोळ्यात चटणी टाकून धारदार शस्त्राने डोकीत, पोटावर, हातावर पायावर ,सपासप वार करून कृष्णा पाटील व माणिक सातपुते या दोघांचा खून केला व सुदाम चव्हाण यास गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, या आरोपाखाली आरोपी राहुल बोराडे व सुभाष बोराडे यांना अटक करण्यात आलेली होती.
बार्शी सत्र न्यायालयाने आरोपी राहुल बोराडे व आरोपी सुभाष बोराडे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उभयतांनी ॲड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन जामीन अर्ज दाखल केला. या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्यासमोर झाली. आरोपीचे वकील व सरकारी वकीलांचा युक्तिवाद होऊन न्यायमूर्तींनी आरोपी राहुल बोराडे व आरोपी सुभाष बोराडे यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी दोन्ही आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. अश्विनी टाकळकर यांनी काम पाहिले.