पुस्तक परिचय !"हुंदका” – स्त्रीमनाचा ठसठशीत हुंकार

shivrajya patra

स्त्रीचं मन हे हळवं, मायाळू आणि सहनशील असतं, हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. परंतु तिच्या मनात दाटलेली भावना, विचार आणि वेदना ती अनेकदा व्यक्त करू शकत नाही. अशा संवेदनशील मनातून उमटणाऱ्या भावनांचा ‘हुंदका’—एक अंतरंगाचा हुंकार—कवयित्री फरझाना इकबाल यांच्या याच नावाच्या काव्यसंग्रहातून प्रकटतो.

या संग्रहात स्त्रीच्या मनोविश्वातील नाजूक छटा, व्यथा, आणि मौनातून येणाऱ्या भावना शब्दरूपात प्रकट झाल्या आहेत. कवयित्रीचं लेखन केवळ भावनात्मक नाही, तर ते सामाजिक जाणिवांनीही समृद्ध आहे. तिचा प्रत्येक कवितेतील ‘हुंदका’ वाचकाच्या मनात प्रतिध्वनित होतो.

स्त्री मनाच्या वेगवेगळ्या भावनांचा जणू एक सोहळाच या काव्यसंग्रहात कवितांच्या रूपाने भरलेला आहे, अशी भावना वाचताना मनात नकळत जागी होते. मुस्लिम मराठी कुटुंबात वाढलेल्या कवयित्री फरझाना इकबाल यांनी सामाजिक कार्य करत असताना अनेक स्त्रियांच्या दुःखद व हृदयस्पर्शी अनुभवांना जवळून पाहिलं. त्या अनुभवांचा प्रत्यय त्यांच्या लेखणीतून उमटतो आणि 'हुंदका' हा काव्यसंग्रह म्हणजे या सर्व अनुभवांचं साहित्यिक रूपांतर आहे.

 दाह माझ्या आतला 

काव्यात मी मांडला 

रिक्त झाली माझी काया 

अदृश्य जखमा झेलाया

या चारोळीच्या माध्यमातून कवयित्रीने केवळ स्वतःच्या नाही तर समाजातील प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणातील वेदनांना शब्दबद्ध केलं आहे. ही वेदना वैयक्तिक नसून सामूहिक आहे; आणि काव्यरूप मायेची फुंकर म्हणजेच हुंदका हा संग्रह.

मुस्लिम मराठी कुटुंबातील कवयित्री फरझाना इकबाल यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक स्त्रियांच्या व्यथा ऐकल्या, अनुभवल्या आणि अंतर्मनाशी बांधल्या. या सर्व अनुभवांचा निचरा त्यांनी या संग्रहातून केला आहे. काव्य म्हणजे इथं त्यांच्या आतल्या जखमांवर त्यांनी स्वतःच लावलेलं एक लयीचं औषध आहे. या संग्रहात एकूण ५५ स्त्रीवादी कविता आहेत, ज्या केवळ भावनिक नाहीत तर वैचारिक दृष्टिकोन देतात. 

२००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीस वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २०११ मध्ये दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय एकूण सहा पुरस्कार प्राप्त झाले असून, इस्त्रायलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या एका मराठी नियतकालिकानेही याची दखल घेतल्याने या कविता आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचल्या आहेत.

या पुस्तकास मुस्लिम साहित्य चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शेख इकबाल मिन्ने यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यांनी आपल्या अभिप्रायात म्हटलं आहे, "या काव्यसंग्रहातून स्त्रियांचे भावविश्व दर्शविण्यास उपयुक्त ठरतात."

पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील चारोळी आणि प्रतीकात्मक चित्र कविता संग्रहाच्या आशयाशी सुसंगत असून, ती वाचकाला लगेचच भावजगतामध्ये घेऊन जाते. डोळ्यांतून ओघळणारे अश्रू, स्त्रीच्या चेहऱ्यावरची निराशा, आणि त्या पार्श्वभूमीवरची ही कविता—या संग्रहाचं सार एकाच दृश्यमुद्रेत उलगडतं.

“नारी” - घराच्या उंबरठ्यावरून झिरपणाऱ्या स्त्रीमनाच्या भावना,या काव्यसंग्रहातील पहिली कविता “नारी”, जरी थोडक्यात लिहिलेली असली, तरी ती स्त्रीच्या अंतर्मनातील सहनशीलता, उदारता आणि द्वंद्व यांचं प्रभावी दर्शन घडवते. विवाहित स्त्री एकाच वेळी माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबांशी निगडित असते—ती जणू या दोन घरांमधील एक हळुवार पण मजबूत नाळ बनते. तिच्या माध्यमातून नात्यांचा समतोल जपला जातो, आणि त्यासाठी ती अनेकदा स्वतःच्या भावना, इच्छा बाजूला ठेवून कार्यरत असते.कवयित्री फरझाना इकबाल घराच्या उंबरठ्याचं प्रतीक वापरून स्त्रीचं हे दैनंदिन मनोविश्व सूक्ष्मपणे उलगडतात. ही केवळ भौगोलिक सीमा नाही, तर ती भावनिक, सामाजिक आणि व्यक्तिगत आभाळाची एक सीमारेषा आहे, ज्यावर उभी असलेली स्त्री दोन जगांमध्ये संवाद साधते.

स्त्रीच्या मनातील प्रेम, राग, खदखद ही ती तिच्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करू शकते - तो प्रियकर असो, पती, पिता किंवा मित्र. या भावना जरी वैयक्तिक असल्या, तरी त्या एका व्यापक स्त्रीमनाचं प्रतिबिंब ठरतात. प्रेम, विरह, स्वीकार आणि विरोध या भावनांच्या गुंत्यातही ती सामर्थ्याने उभी असते - हे कवयित्रीने अत्यंत प्रत्ययकारी रितीने दाखवून दिलं आहे.

स्त्री आपल्या अस्तित्वाची लढाई गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासूनच लढू लागते, ही कटू पण वास्तवपूर्ण जाणीव "लढा" या कवितेतून व्यक्त होते. भारतात कायद्याने स्त्री भ्रूण हत्या गुन्हा ठरवला असला, तरी समाजाच्या काही थरांमध्ये अजूनही पोटातील कळीला खुडण्याचे भयंकर प्रयत्न सुरू आहेत.

या कविता केवळ एका सामाजिक प्रश्नाचं वर्णन करत नाही, तर ती स्त्रीच्या अस्तित्वाच्या उगमाशीच प्रश्न विचारते—स्त्रीच स्त्रीच्या अस्तित्वाच्या विरोधात कशी उभी राहते? हे अत्यंत गुंतागुंतीचं आणि धगधगतं सत्य कवयित्रीने आपल्या ओळींत मांडलं आहे.

"पोटात बीज अंकुरे 

मुलगी आहे कळताच  

आईचे काळीज तुटे 

 बापाची मान ही झुके..."

या ओळींतून फक्त समाजाची मानसिकता नाही, तर त्या गर्भातील जीवाची आर्त आक्रोशही ऐकू येतो. "अस्तित्वाचे लढे तिने तेव्हा पासून दिले"—ही एक ओळ जणू संपूर्ण कवितेचा गाभा आहे. कवयित्री फरझाना इकबाल यांनी या कवितेतून स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात एक सशक्त, स्पष्ट आणि संवेदनशील भूमिका घेतली आहे.

कवयित्री फरझाना इकबाल यांच्या “आशा” या कवितेतून स्त्रीच्या समर्पणाची, तिच्या भावनिक अपेक्षांची आणि प्रेमातील निःशर्त भावना ओघवत्या शब्दांत सामोरी येते. एक स्त्री ज्याच्यावर मनापासून प्रेम करते, त्याला ती तनमन अर्पण करते—आणि त्या बदल्यात तिची एकच अपेक्षा असते—तिने अनुभवलेल्या भावनांना, व्यथांना तो समजून घ्यावं.

"मित्र तूच, सखा तूच 

  सोबती तूच, पती तूच 

 माझी मी कोणीच नाही 

   माझे तर सर्वस्व तूच"

या ओळींच्या माध्यमातून एक भारतीय स्त्री प्रेमात स्वतःचं अस्तित्व विसरून केवळ प्रिय व्यक्तीच्या भावविश्वात विलीन होते, हे कवयित्रीने प्रांजळतेनं दाखवलं आहे. “माझी मी कोणीच नाही” ही ओळ केवळ समर्पणाचं वर्णन नाही; ती स्त्रीच्या अस्तित्वाच्या विरघळलेल्या रेषेची हाक आहे - जी त्या पुरुषात स्वतःला पुन्हा शोधते.

ही कविता केवळ स्त्रीच्या भावनांचं वर्णन करत नाही, तर त्या भावनांमधल्या निव्वळ विश्वासाचं, आशेचं आणि संवादाच्या गरजेचं सूक्ष्म चित्रण करते. हे कवितेच्या शीर्षकाशीही सुसंगत आहे - “आशा” ही त्या स्त्रीची, की जिचं मन ऐकून घेतलं जाईल.

आळवणी आणि कल्पना या कवितांमधून शृंगार आणि सौंदर्याचं नाजूक चित्रण पाहायला मिळतं, तर बंधन कि मिलन या कवितेतून फरझाना इकबाल लग्नाच्या संकल्पनेवर सूक्ष्म भाष्य करतात. अनोळखी घरात पाय टाकणाऱ्या नववधूच्या मनातील भीती, आशा, तडजोड आणि प्रेम या संमिश्र भावना कवयित्रीने अत्यंत तरलपणे मांडल्या आहेत -

"लग्न हे बंधन कि मिलन 

   ज्याच्या त्याच्या मते ठरते 

    तडजोडीचे महत्व मात्र 

   लग्नामुळेच वाढते"

या ओळी नवविवाहित स्त्रीच्या मनातील गुंतागुंतीचा अनुभव समजावून सांगतात.संसार कवितेतून, "तू कितीही शिकलीस तरी तुझ्या नशिबी चुल्हा" यासारखी कटू, पण वास्तवदर्शी भावना व्यक्त होते. कोमेजली आणि चकोर या कवितांमधून नववधूच्या पहिल्या रात्रीच्या मनातील अनामिक भीती आणि विचारांचा कोलाहल शब्दरूपात ओघवतो.तर काजवा कविता आशेचा साक्षात दीप आहे. अंधारात एक लखलखता किरण घेऊन आलेल्या काजव्याचं रूपक वापरून कवयित्रीने जगणाऱ्या मनाला नवी दिशा दिली आहे—

"काळोख संपण्यासाठी 

 काजव्याने साथ केली 

 सोबतीला आहे ही आशा 

 मनाला उभारी देऊन गेली"

या कवितांमधून फरझाना इकबाल यांनी स्त्रीच्या मनातील शृंगार, सौंदर्य, तडजोड, संघर्ष आणि आशा या सर्व भावनांना विलक्षण सुसंगतीने कवितारूप दिलं आहे.

कवीला केवळ प्रतिभा नव्हे, तर अनुभवांची चव, वेदनांची ओल, आणि शब्दांची धार लागते. फरझाना इकबाल यांचा “हुंदका” हा काव्यसंग्रह याच कावित्वाची ठळक साक्ष आहे. “जिद्द” या कवितेतून कवयित्री स्वतःच्या आयुष्यातील तुटलेल्या संवादांचा, नाकारलेल्या भावनांचा आणि उरलेल्या आश्रयाचा आवाज बनून समोर येतात -

"ज्या शब्दांनी तू निंदलेस 

त्याच शब्दांची मला साथ आहे"

अशा ओळी मनात खोल उतरतात. त्यात स्त्रीचं धीरगंभीर आत्मभान आहे.

या संग्रहातील श्वास, शब्द, भूतकाळ, यंत्र, मीच माझ्या वेदना, डाग, आणि दुरावा अशा कविता स्त्रीच्या विविध भावछटांची प्रचिती देतात - कधी आईची ओढ, कधी नववधूचं धडधडणारं मन, कधी विरहातील तगमग, तर कधी अंतर्मनातील बंड. या सर्व कविता समस्त स्त्रीजातीच्या मनोगतीचा आरसा ठरतात.

“हुंदका” हा केवळ कविता संग्रह नाही, तर तो एक भावनांचा संचित झरा आहे - स्त्रीच्या अंतरंगाचा, तिच्या अस्तित्वाच्या लढ्याचा, तिच्या प्रेमाच्या उर्मीतून आलेल्या आर्त हुंकाराचा. फरझाना इकबाल यांनी आपल्या लेखणीतून उभं केलेलं हे स्त्रीमनांचं विश्व हळुवार आहे, पण त्यात प्रश्न आहेत, असह्यतेचा चटका आहे, आणि त्याहीपेक्षा अधिक -एक उभारी आहे.

या संग्रहातील कविता भावनेचा कीस पाडत नाहीत, तर त्या संवेदनांना अर्थवहिण्या बनवतात. ती प्रत्येक कविता स्वतःत एक अनुभव आहे, एक विचार आहे, एक कहाणी आहे. सामाजिक वास्तव, भावनिक जडत्व, प्रेम, नात्यांची गुंतागुंत, अस्तित्वाचा संघर्ष - हे सगळं हुंदका मधून उमगू लागतं.

फरझानाजींचं लेखन हे स्त्रीच्या आवाजाला शब्द देणारं, तिच्या मौनातल्या अर्थाला आळवणारं आहे. म्हणूनच “हुंदका” प्रत्येक संवेदनशील वाचकाने अनुभवायला हवा, कारण हे केवळ कवितांचं पुस्तक नाही - हे एक स्त्रीस्वर आहे, तोवर घुमणारा, जेव्हा पर्यंत तो ऐकला जात नाही.

कवयित्री फरझाना इकबाल यांच्या अभूतपूर्व लेखन कौशल्यास सलाम, आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

----------

परीक्षण/समीक्षण  :  खाजा बागवान, सोलापूर 

पुस्तकाचे नाव : “हुंदका” (काव्यसंग्रह)

लेखिका, कवयित्री : फरझाना इकबाल 

प्रकाशक : फर्ज प्रकाशन 

प्रकाशन वर्षे : पहिली आवृत्ती १० जुलै २००९    

                    दुसरी आवृत्ती १५ ऑगस्ट २०११

एकूण पृष्ठसंख्या : ८०

वाड्:मय प्रकार : काव्यसंग्रह

मूल्य : १२० रु. 

-------------

To Top