सोलापूर : एकीकडे सरकार श्रीमंत आमदार खासदारांचे 25 टक्के पगार वाढ करते अन् गोरगरिबांना महागाईच्या खाईत लोटत आहे. एकिकडे अदाणी-अंबानींसारख्या उद्योगपतींचे लाखो कोटीचे कर्ज सरकार माफ करून सर्वसामान्य जनतेकडून वाढीव कर लावून जनतेची लुट करीत आहेत, असा आरोप संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आला.
निमित्त होते... पेट्रोल डिझेलनंतर नुकतीच गॅस दरात झालेल्या दरवाढीचे ! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने देशातील नागरिकांना 'अच्छे दिन' चे स्वप्न दाखवून सत्ता काबीज केली. पण गरिबांना दिवसेंदिवस महागाईचा सामना करताना 'बुरे दिन' चा कटू अनुभव घ्यावा लागत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर नुकतीच स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ केल्यामुळे जनता महागाईत होरपळून निघत आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी मंगळवारी, ०८ एप्रिल रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकामध्ये महागाईच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी 'अच्छे दिन, अच्छी महंगाई' 'वा रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल' अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
पेट्रोल डिझेल, गॅस सोबतच सर्व जीवनाशक वस्तूंची किमती वाढल्या आहेत. सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. सर्वसामान्यांचे स्वयंपाक घरातील बजेट यामुळे बिघडणार आहे. परिणामी महिलांमध्ये सरकार विरोधात पुन्हा एकदा नाराजी निर्माण झाली असून लाडक्या बहिणी दुखावल्या आहेत, अशीही भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, शहर सचिव सिद्धाराम साबळे, शहर उपाध्यक्ष रमेश भंडारे, शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे, प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ राजगुरू, शहर उपप्रमुख फिरोज सय्यद, वकील आघाडीचे जिल्हाप्रमुख गणेश कदम, दिलीप निंबाळकर, अभिषेक जहागीरदार, राजनंदनी धुमाळ, शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव, शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी आदी उपस्थित होते.