सोलापूर : व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह नोकरदार, राजकारणींना जात प्रमाणपत्र पडताळणी बंधनकारक आहे. जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी समितीकडे हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. पण पूर्णवेळ अध्यक्ष व सदस्य नसल्या कारणाने हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित पूर्ण वेळ अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक करण्यात यावी, या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सचिव सचिन कवले यांना देण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांना सुद्धा ई-मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे.
सध्या सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू असून नीट साठी नोंदणी लवकरच सुरू होणार आहे. दरवर्षी सोलापूरसह राज्यभरात सुमारे पाच ते सहा लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात, यातील दोन ते तीन लाख विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ची आवश्यकता भासते.
त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी जात वैधता समितीकडे अर्ज केलेले आहेत, पण जात वैधता समितीकडे राज्यात 36 समित्यासाठी अवघे चार अध्यक्ष असल्याकारणाने व एका अध्यक्ष कडे सोलापूरसह दहा जिल्ह्यांची जबाबदारी असल्या कारणाने हजारो अर्ज प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दररोज साधारण दीडशे प्रकरण दाखल होत आहेत तर समितीकडे जानेवारी अखेर साडेचार हजार प्रकरणे प्रलंबित आहेत.
विविध आरक्षणाचा लाभ घेणार्या विद्यार्थ्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर विविध ठिकाणी सवलतीत प्रवेश मिळतो, जात प्रमाणपत्र नसेल तर खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होऊन विद्यार्थ्यांचे ससेहेलपाटे होत आहे. त्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळणे आवश्यक आहे. सरकारचे याबाबत विद्यार्थ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष नाही. शासनाच्या वतीने समितीचे अध्यक्ष व सदस्य यांची योग्य प्रमाणात नियुक्ती केली गेली नाही. त्यामुळे हजारो जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणे प्रलंबित आहेत, असं संभाजी ब्रिगेडचं म्हणणं आहे.
शासनाने या विद्यार्थ्यांच्या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक असून त्वरित योग्य प्रमाणात पूर्णवेळ अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करण्यात यावी. आरक्षण लाभार्थी विद्यार्थ्यावर सरकार अन्याय करीत असून जर जात वैधता प्रमाणपत्रामुळे एखाद्या विद्यार्थ्याला खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावा लागला, तर याच्याविरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, उपाध्यक्ष मनिषा कोळी, उपशहर प्रमुख फिरोज सय्यद, दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, गौरीशंकर वर्पे, श्रीशैल आवटे, वैभव धुमाळ, विजयद्र कुमठेकर आदी उपस्थित होते.