सोलापूर : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत. शासकीय विविध योजनांचे अभिसरण केल्यानंतर गावचा विकास हा राज्यासाठी आदर्शवत करता येतो. सरपंचांनी पुरोगामी परिणामांचा आदर्श गावाच्या विकासामध्ये ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विकास प्रशासन प्रबोधिनी तथा यशदाचे राज्य प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी बोलताना केले.
उत्तर सोलापूर पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरपंच ग्रामसेवक गावचा विकास आराखडा कार्यशाळेत ते बोलत होते.
प्रारंभी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेचा प्रारंभ झाला. याप्रसंगी गटविकास अधिकारी बी.सी. पाटील, शिवश्री शिंदे , यशदाचे राज्य प्रशिक्षक ह. बा. कादे, पंचायत समितीचे वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र वारगड, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष आणि नरटेवाडीचे सरपंच भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.
15 व्या वित्त आयोगाचा आराखडा बनवताना लोकांच्या समस्या आराखड्यामध्ये दिसल्या पाहिजेत. गाव गरिबी मुक्त करून उपजीविकीचे साधन गाव पातळीवर उपलब्ध करून दिली पाहिजे, असं सांगून पवार यांनी, जल, जंगल आणि जमिनी यावर ग्रामपंचायतीने विशेष भर देऊन शुद्ध पाणी यासह गावच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
गावामध्ये ग्रामसभा वाजत-गाजत झाली पाहिजे. विकासामध्ये सर्व घटकांना न्याय देता आला पाहिजे. शासनाच्या वेळोवेळीच्या निर्देशानुसार आराखड्यामध्ये बदल करून आदर्श आराखडा हा गावाला वेगळ्या विकासाकडे घेऊन जातो, राज्यातील इतर आदर्श गावांना भेटी दिल्या पाहिजेत. मळेगावसारखं गाव आपला आदर्श जिल्ह्याला देऊ शकतो, अशा गावांना भेटी दिल्या पाहिजे, असं आवाहनही पवार यांनी यावेळी केले.