मोहोळ : क्रांतिवीर भगतसिंग कराटे अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुले मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारीत आहेत, ही अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे समितीचे सदस्य अॅड. प्रणव परिचारक यांनी केले.
क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँन्ड स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयस्तरावर मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रणव परिचारक बोलत होते.
कोरोना काळापासून मुलांच्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबरच संवाद कमी होऊन, खेळाच्या मैदानावरील आवड कमी झालीय. त्यांचं मोबाईलशी नाते घट्ट होत आहे. जागरूक पालकांनी यासंबंधी विचार करून आपल्या मुलांना मैदानावरील खेळांकडे नेण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही प्रणव परिचारक यांनी यावेळी केले.
विचारपीठावर सहा. पोलीस निरीक्षक किरण पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनंत नागणकेरी, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संजय आठवले, कार्यक्रमाचे संयोजक व प्रशिक्षक दशरथ काळे, पत्रकार भारत नाईक, रणजीत भोसले, सोलापूर जिल्हा खो-खो असोसिएशनचे संतोष कदम, मंगेश पांढरे, माजी प्राचार्य श्रीधर उन्हाळे, विष्णु शिंदे, न्यूज चैनल चे पत्रकार अशोक कांबळे, दिनेश सातपुते, अक्षय वाडकर, विजय नागमोडे, कराटे प्रशिक्षक दिलीप शिंदे, नितीन बारसकर, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.
मुलांच्या मानसिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना मैदानी खेळांची सवय लावण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. क्रांतिवीर भगतसिंग अकॅडमीने विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न होण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केल्यामुळेच राष्ट्रीयस्तरापर्यंत मोहोळ शहरातील मुलांनी चमकदार कामगिरी केली असल्याचे दशरथ काळे यांनी प्रास्ताविकात म्हटले.
यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद कोरे यांनी केले तर नितीन बारसकर यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
-चौकट-
... मुले कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहतील : स. पो. नि. किरण पाटील
लहान वयातच मुलांना खेळाची आवड निर्माण होऊन त्यांच्यामध्ये संस्कार रुजले गेले तर ती मुले भविष्यात कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार राहतील. अशा अकॅडमीच्या माध्यमातूनच शिस्त संस्कार व आरोग्य चांगले ठेवण्याची मुलांना सवय लागेल, असं सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.