सोलापूर : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बालशक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हा ०५ ते १८ वर्षापर्यंत शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे, अशा बालकांना हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेत स्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत.
ज्या मुलांचे वय ०५ पेक्षा अधिक व ३१ जुलै, २०२४ रोजी १८ वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी/जिल्हा दंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करु शकतात. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त मुलांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी केलं आहे.