सोलापूर : येथील ब्राह्मण समाज सेवा संघ आणि डॉ. चाटी ट्रस्ट, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. त्रिंबक लक्ष्मण चाटी स्मृती जीवन गौरव पुरस्कार आणि समाज भूषण पुरस्काराचे शनिवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा.का. किर्लोस्कर सभागृहात सोलापूरचे ज्येष्ठ विधीज्ञ विजय मराठे यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.
यावर्षी डॉ. त्रिंबक लक्ष्मण चाटी स्मृती जीवन गौरव पुरस्कार सांगोल्याच्या डॉ. संजीवनी केळकर यांना तर समाजभूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर ब्राह्मण समाज सेवा संघाचे अध्यक्ष हरिभाऊ कुलकर्णी, सचिव महेंद्र देवस्थळी, चाटी ट्रस्टच्या मीना चाटी आदी उपस्थित होत्या.
डॉ. संजीवनी केळकर यांनी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांगोल्यासारख्या माळरान असलेल्या प्रदेशात वैद्यकीय सेवेबरोबरच बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून महिलांचा उत्कर्ष घडवून आणला. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना डॉ. त्रिंबक लक्ष्मण चाटी स्मृती जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, पगडी आणि ११ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.
लातूरसारख्या मराठवाड्यातील शहरातून दैनिक सोलापूर तरुण भारतचे वार्ताहर म्हणून काम सुरू करून तरुण भारतच्या संपादक पदापर्यंत कार्य करणारे अरविंद जोशी यांनी त्यांच्या कारकिर्दीत नि:स्पृहपणे पत्रकारिता केली. अनेक पत्रकारांना मार्गदर्शन करीत पुस्तकाचे लिखाणही केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी बोलताना अॅड. विजय मराठे म्हणाले, आपल्या कार्याची ओळख झाली. १०० वर्षांपासून दोन्ही संस्था कार्यरत आहेत, ही गौरवास्पद बाब आहे. गरीब होतकरू मुलांना शिक्षण होईपर्यंत शिष्यवृत्ती द्यावी, प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी ही शिष्यवृत्ती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुरस्कार प्राप्त डॉ. केळकर म्हणाल्या, माझ्या एकटीचा नाही. ज्यांनी ज्यांनी योगदान दिले, त्या सर्वांचा हा पुरस्कार आहे. सर्वांबरोबर मैत्री ठेवली, त्याचा सकारात्मक परिणाम सर्वत्र दिसून आला. पाच बिंदूवर काम चालू आहे. महिलांचे सबलीकरण केले. जलसंधारणाचे काम केले. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या.
अरविंद जोशी यांनी आपल्या मनोगतात म्हणाले, हा सन्मान अनपेक्षितपणे मिळाला आहे. डॉ. संजीवनी केळकर यांच्या समवेत पुरस्कार मिळाला, हे भाग्य समजतो. पत्रकारिता करताना सकारात्मक विचार केला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सरदेशमुख यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय जितेश कुलकर्णी यांनी करुन दिला. पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा परिचय आणि मानपत्र वाचन माधव देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले तर संस्थेचे सचिव महेंद्र देवस्थळी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास दोन्ही संस्थांचे संचालक, समाजातील अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.
फोटो ओळी : ब्राह्मण सेवा संघ सोलापूरच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांना समाजभूषण पुरस्कार व डॉ. संजीवनी केळकर यांना डॉ. चाटी स्मृती जीवन गौरव पुरस्काराने अॅड. विजय मराठे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी राम तडवळकर, महेंद्र देवस्थळी, मीना चाटी, हरिभाऊ कुलकर्णी छायाचित्रात दिसत आहेत.