(संग्रहित छायाचित्र)
सोलापूर : पाण्यासाठी ठणाणा येथील नागरिकांतील अलिकडील नव्या पिढीच्या जणू 'पाचवी' ला पूजलेला म्हणण्याची वेळ आलीय. शहरात ४ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा शहरातील जोडभावी पेठ परिसरात सातव्या दिवसावर आलाय. त्यातूनही झालेला पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिक टेंपरेचर वाढलंय. या भागातील पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा रविवारी, भाजपाचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिलाय.
प्रारंभी नियमित पाणीपुरवठा एक दिवसाआड सुरू झाला. सध्या पाच दिवसाआड पिण्याचे पाणी येते. कधी काळी सोलापुरातील कष्टकऱ्याला-मागतकऱ्याला पोटाला भाकरी मिळाली नाही, अशी कल्पना केली तरी तो कोणत्याही चौकातील सार्वजनिक नळावर पोटभर पाणी पिऊन सुखानं झोपायचा, असं म्हणणारे त्या दिवसांचे साक्षीदार पाण्याच्या प्रश्नावर चर्चा होताना आवर्जून बोलतात. आज सार्वजनिक नळ गायब आहेत. वैयक्तिक नळाला दोन दिवसाआड, त्यानंतर तीन दिवसाआड असं करता-करता सोलापुरी नागरिक ५ दिवसाआड नळाला पाणी भरतोय, हे शहराचं वास्तव आहे.
जोडभावी पेठ परिसरात मात्र ०६-०७ दिवसाला पाणी पुरवठा करण्यात येतोय. त्यात ही काही ठिकाणी पाणी उशिरा सोडणे, प्रेशर कमी असणे, पिवळसर, घाण पाणी येत आहे तर काही ठिकाणी पाण्याला वास येत आहे. या सर्व प्रकारासाठी सोलापूर महानगरपालिकेचा नियोजनशून्य कारभार हे एकमेव कारण आहे, असं माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांचा दावा आहे.
या प्रकाराला आळा घालणारे कोण आहेत का नाही, असा सवाल सुरेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नी जनआक्रोश मोर्चा काढताना आचारसंहितेचा भंग झाल्यास त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी, असं पाटील यांनी म्हटलंय.