Type Here to Get Search Results !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणाचे... ?

 

हिष्कृत भारताला प्रबुद्ध भारत बनविण्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अंतिम इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली. डॉ. बाबासाहेब आंबेडकराना भारतात सार्वभौम, लोकशाही, गणराज्य प्रस्थापित करायचे होते, म्हणून त्यांनी भारतीय घटनेच्या सारनाम्यात सार्वभौम, लोकशाही, गणराज्य या शब्दांचा उल्लेख केलेला आहे. डॉ. बाबासाहेबांची लोकशाही बद्दलची विचारसरणी भारतालाच नव्हे तर सम्पूर्ण जगाला प्रेरणादायी आहे, असे म्हणता येईल. अशा महामानवाची फक्त देशातच नव्हे तर सम्पूर्ण जगात विविध राष्ट्र, संघठना, संस्था, व्यक्ति बाबासाहेबांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा जागर करीत असतात.


सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या विश्वरत्न बाबासाहेबांना लहानपणापासूनच समाजभिमुख संस्कार मिळाले होते. 'माणसाच व्यक्तिमत्व तो कोणाच्या सानिध्यात वाढतो यावर जसं अवलंबून आहे; तसंच तो कोणत्या विचारांच्या सहवासात वाढतो, यावर सुद्धा अवलंबून असते.' 


बाबासाहेब वाढले बुध्द, सम्राट अशोक, शिवराय, तुकोबाराया, फुले, शाहू महाराजांच्या विचारात; आणि म्हणूनच त्यांच व्यक्तिमत्व हे जगाला आदर्श देणार व्यक्तिमत्व घडलं. ऐन उमेदीच्या काळात सळसळत्या तरुण रक्ताला जर योग्य विचारांची दिशा मिळाली नाही तर चक्रीवादळात भरकटलेल्या कागदासारखं आयुष्य भरकटलं जाते.


जिजाऊँनी छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार देऊन स्वराज्य स्थापन करुन घेतले, तर बाबासाहेबांनी लेखणीच्या धारेने संविधान निर्माण करुन हजारो वर्षापासून अधिकारांपासून वंचित असलेल्या कष्टकरी, ओबीसी, शेतकरी, महिला, दलित यांना अधिकार बहाल करुन  दिले. 


आज देशातील तरुणांना याचं लेखणीच्या धारेने व बुद्धिच्या ढालेने स्पर्धेची व माणुसकीची लढाई जिंकायची आहे: कारण, "जी माणस पायांनी चालतात, ती फक्त अंतर कापतात, पण जी माणस बुद्धिने चालतात, ती यशाच्या शिखरावर  पोहोचतात."


ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सम्पूर्ण जगाने ज्ञानाचे प्रतिक म्हणून गौरव केला, त्याच डॉ. आंबेडकरांना मात्र त्यांच्याच देशात त्यांना दलितांचे नेते, दलितांचे उद्धारकर्ते एवढ्या मर्यादेत इथली सनातनी मनुवादी व्यवस्था विविध माध्यमातून गेल्या ६० वर्षापासून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झालेत. 


आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून बाबासाहेबांनी  दलितांकरिता कार्य केलेच पण तेवढ्या मर्यादेतील त्यांचं कार्य नसून सम्पूर्ण भारतियांच्या  आणि मानवी कल्याणाचे कार्य केले आहे. हे सांगण्याची जबाबदारी आमची आहे. तोच प्रयत्न या लेखातून या ठिकाणी पुढे थोडक्यात करत आहो.


डॉ. बाबासाहेब आणि ओबीसी:

या देशातील ५२ टक्के असलेला बहुसंख्य ओबीसी वर्ग हा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिकरित्या मागासलेला आहे. या समाजाला विकासाच्या प्रवहात आणायचं असेल तर त्याला संविधानिक आरक्षण देणे गरजेचे आहे, हे ओळखून ३४० व्या कलमानुसार ओबीसींच्या आरक्षणाची तरतूद संविधानात केली आहे. आज ओबिसिला शिक्षणात-नोकरीत प्रतिनिधित्व मिळत आहे, ते बाबासाहेबांमुळेच. परंतु आमच्या ओबीसींना असं वाटतं की, आम्हाला आरक्षण व्ही. पी. सिंगने दिले, तोच आमचा मसीहा आहे. जर बाबासाहेबांनी संविधानात तरतूद करुन ठेवली नसती तर व्ही. पी. सिंगच काय कुठल्याच शासनकर्त्यानी ओबीसींना आरक्षण दिले नसते. 


बाबासाहेबांच्या काळातील तत्कालीन सरकार जेव्हा ३४० व्या कलमाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करू लागले, तेव्हा बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. म्हणजे ओबीसींच्या हिताकरिता मंत्री पदाला लाथ मारणारा भारतातील एकमेव पुढारी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर... !  ज्यांनी  आमच्याकरिता मंत्री पदाला लाथ मारली त्यांच्या विचारांपासून आम्ही दूर जात आहोत. 


ज्या समाजाने बाबासाहेबांचे विचार स्विकारले त्या गावकुसाबाहेरील समाजातील आज शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी तर खूप झालेत पण तहसीलदार, जिल्हाधिकारी, न्यायाधीश ते राष्ट्रपतिपदापर्यंत या ७० वर्षात मजल मारू शकले.  आम्ही ओबीसी फक्त त्यांच्यावर टीका करण्याच काम करतो, (काहींची चर्चा तर आंबेडकर आणि मुसलमान या पलीकडे जात नाही) त्यांच्या जिद्द व संघर्षाचा विचार करत नाही.


आजही आमच्या प्रगतिचा आलेख ढासळला तो ढासळतच आहे. कंबरडे मोढलेल्या बैलासरखी आमची परिस्थिति झालेली आहे, ना धड बसता येत ना धड चालता येत. या मागची कारणे उदासीनता, जिद्दीचा अभाव व पे बॅक टू सोसायटी ही भूमिका प्रभाविपणे राबविण्यात आम्ही अयशस्वी ठरलोत. म्हणून आम्हाला प्रगती करायची असेल तर, कोणाचे विचार स्विकारावे लागतील याचा विचार करतो, तेव्हा आम्हाला शिवराय- फुले-शाहू-आंबेडकर यांचेच विचार तारू शकतात.  कोणा बुवा- बापू-अम्माचे नाही. 


महिला कामगारांना प्रसुती रजा:

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना १७ मार्च १९४५  रोजी  'स्टैंडिंग लेबर कमेटी' च्या बैठकीत महिला कामगाराला बाळंतपणाच्या सर्व सुविधा, रजा व त्या काळातील पगार बिल मांडून ते मंजूर करुन घेतले, म्हणून आज स्त्रियांना या सुविधा मिळत आहेत.परंतु हे कार्य महिलांपर्यंत गेलेच नाहीत किंवा ते येऊच दिलं गेले नाही. बाबासाहेबांचे गुरु महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी स्त्रियांना शिक्षण देऊन सुशिक्षित केले तर आंबेडकरांनी सुरक्षित आणि सक्षम केले हे विसरून कसे चालणार . बहिणींनो... ! 


मनुस्मृतिचे दहन आणि महिला:

ज्या मनुस्मृतिने स्त्रियांच्या अधिकारांना नाकारुन स्त्री गुलामीचे समर्थन केले, त्या मनुस्मृतिचे २५ डिसेम्बर १९२७ रोजी रायगडाच्या पायथ्याखाली महाड येथे दहन करुन स्त्रियांवार अन्याय करणाऱ्या कायद्यालाच जाळून स्त्रीयांना स्वतंत्र केले. अन्यथा आजही तुम्हाला दररोज  सती जावे लागले असते. केशवपन करावं लागलं असतं व पुनर्विवाह करता आला नसता. म्हणून खऱ्या अर्थाने स्त्रियांचा मुक्तिदाता जर कोणी असेल तर ते बाबासाहेब आंबेडकर आहेत. कोणी अम्मा, राधे माँ, बुवा-बापू नाही, हे लक्षात घ्या.  स्त्रियांना जर अधिक सक्षम व्हायचे असेल तर जिजाऊ, सावित्री, अहिल्याई होळकर, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार वाचून ते जिवनात अंगिकारावे लागतील, तरच आजची स्त्री अधिक सक्षम होऊ शकेल.


नद्याजोड प्रकल्प: 

पावसाने नद्याना पूर आला की चर्चिला जाणारा विषय म्हणजे नद्याजोड प्रकल्प; परंतु हा प्रकल्प सध्या कोणाच्याही नावाने खपविण्याचा प्रयत्न मनुवादी प्रचार - प्रसार माध्यमे करत आहेत. हे डाव आम्ही अनुयायानी हाणून पाडणे आवश्यक आहे. १९४२ ते १९४६ या काळात 'जलसाक्षरता'  या मिशन अंतर्गत देशायातिल कोरडया दुष्काळावर मात करणे व पूर समस्या दूर करण्यासाठी नद्याजोड प्रकल्पाची योजना आंबेडकरांनी मांडली होती. परंतु भारतीय पुढाऱ्यांची अनिच्छा व अकार्यक्षमता यामुळे ती योजना ७० वर्षे होऊन सुद्धा पूर्णत्वास येऊ शकली नाही. 


देशात ज्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ते थांबवण्यासाठीच्या उपायापैकी जसा "स्वामीनाथन आयोगाच्या शिफ़ारशी" लागू करणे, हा उपाय आहे. तसंच नद्याजोड प्रकल्पाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. परंतु या दोन्ही योजनांवर सरकार काम करत नाही, यावरून सरकार शेतकऱ्यांचे किती हित बघत आहे, हे लक्षात येते. (बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियां,  शेतकरी आणि ओबीसी करिता अजून काय केलं, यावर स्वतंत्र विषय घेऊन विस्तृत लिहिता येईल.... )


समारोप

मित्रांनो, आतापर्यंत मी काही मुद्दे तुमच्यासमोर ठेवले आहेत. त्यावरून बाबासाहेबांचे जे कार्य आहे, ते फक्त एका जाती, धर्मापुरते मर्यादित होते, असे वाटतंय का?  ज्या काळात दलित समाजामधील स्त्रियांना कोणतेही पद नव्हते, त्या काळात स्त्री अधिकारांच्या कायद्याची निर्मिती केली, ज्या काळात दलित तरुणाकडे शिक्षण नव्हते, त्या काळात भारतीय तरुणांना शिक्षण आणि नौकरी देण्याची हमी देणाऱ्या कायद्याची निर्मिती केली.


तत्कालीन परिस्थितीत बाबासाहेबांनी केलेले काम आणि आखलेल्या योजनांचे लाभधारी दलित बांधव होऊ शकत नव्हते तरिसुद्धा ते काम त्यांनी केले. म्हणजे ज्या समाजात जन्माला आले त्या समाजाच्या विकासाकरिता काम तर केलेच तो लेखनाचा वेगळा विषय होईल, परंतु त्यांनी 'माझा भारत देश व माझे भारतीय हा दॄष्टिकोण ठेऊन कार्य केले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतियांचे आणि  समस्त मानवजातीच्या विकासाचे महामेरू होते, ते समस्त भारतियांचे आणि जगाचे होते. हे समजून घेतलं तरचं त्यांना जयंतीदिनी अभिवादन केलं, असं म्हणता येईल.

अनिल भुसारी, तुमसर, जि.भंडारा  8999843978