सोलापूर : गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, जीवे ठार मारणे, नागरिकांना शिवीगाळ दमदाटी, मारहाण करून गंभीर दुखापत करणे आणि महिलांना लज्जा उत्पन्न होईल, अशी कृत्यं करणे यासारखे अनेक गुन्हे दाखल असलेल्या सौदागर सुधीर क्षिरसागर (वय ३२ वर्षे) यास पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलंय.
येथील न्यू बुधवार पेठेतील रहिवासी सौदागर सुधीर क्षीरसागर याच्याविरुध्द सन २०११ ते २०२३ या कालावधीमध्ये वरीलप्रमाणे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ८१५/२०२४ दि.२२ मार्च अन्वये सौदागर क्षिरसागर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता बुधवारी, ०३ एप्रिल रोजी पासून तडीपार करण्यात आलंय. त्यास तडीपार केल्यानंतर निगडी, पिंपरी चिंचवड येथे सोडण्यात आलं आहे.