मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे माढा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शुक्रवारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माढा संपर्कप्रमुख संजय कोकाटे, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा प्रमुख रामचंद्र टकले, शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख विनोद पाटील, सुभाष पाटील-सरपंच (आहेरगाव), सुनिल गव्हाणे विद्यार्थी संघटना, पंढरपूर, इत्यादींचा पक्षप्रवेश झाला. यावेळी संजय कोकाटे संजय पाटील-घाटणेकर, अभिजीत पाटील, बळिरामकाका साठे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील सामान्य माणसाला राज्यातील जी परिस्थिती आहे, त्या संदर्भात प्रचंड राग आणि असंतोष सामान्य माणसांमध्ये आहे. कशा प्रकारे सत्ता टिकवण्याचे सुरू आहे हे आपण आज बघत आहे. सत्तेचा गैरवापर करून दबाव टाकून पक्षात घेण्याचे काम सुरू आहे. १९ मधील निवडणुकीमध्ये देखील असेच सुरू होते. त्यावेळेस देखील मी सांगितलं होतं की, यांना जर तिकडे याचाच अर्थात तिकडे परिस्थिती चांगली नाही. या निवडणुकीमध्ये महागाईला कंटाळलेल्या जनतेने, बेरोजगार असलेल्या युवकांनी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, हे सर्व कधी निवडणूक लागते, याची वाट बघत होते. असेही जयंत पाटील म्हणाले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, आमच्याकडे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. तर दुसऱ्या बाजूला सत्तारूढ पक्षाकडे कॉन्टॅक्टर आहे. आमच्या पक्षात एखाद्या व्यक्तींनी प्रवेश केला, तर त्यांच्या मागे तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते.
निवडणुका जर जाहीर झाल्यास तपास यंत्रणेने आपलं काम थांबवलं पाहिजेत. एखादा पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून जर रिंगणात असेल तर त्या नेत्यांवर तुम्ही कारवाई करत आहात, याचा अर्थ तुम्ही लोकशाही विरोधात आहात असा अर्थ देशातील जनता काढू शकते, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, भाजपला ४०० खासदार निवडून आणायचे आहेत, ते याकरिता की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलण्याकरिता यांना खासदार निवडून आणायचे आहे. या देशातील घटना बदलून सर्व अधिकार आपल्याकडे आणण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. देशामध्ये लोकशाही टिकवायची की नाही, त्या दृष्टीने ही लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. हे सर्व तुम्हा आम्हाला ठरवायचं आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील म्हणाले की, संजू भाऊ कोकाटे तुम्ही योग्य पाऊल टाकलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मी तुमचं स्वागत करतो. माढ्यामध्ये पक्ष संघटना बळकट केली तर तिथे तुमच्या शिवाय दुसरं कोणी नाही. पक्ष संघटना बूथ पर्यंत पोहोचवली तर तुमचा सूर्य तुतारीच्या नावाने उगवेल, त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, ताकदीने काम करा, असेही जयंत पाटील म्हणाले.