पवित्र रमजान महिन्याची दोन दिवसात सांगता होणार आहे. महिना कसा गेला, ते समजले देखील नाही. महिनाभर रोजे, पाचवेळची नमाज, तरावीहची नमाज, सहेरी, इफ्तार या दिनक्रमामुळे दररोजच्या जीवनाला एक नवी दिशा प्राप्त झाली. वेळेची शिस्त निर्माण झाली. सर्व कामे वेळेवर करण्याची स्वयंशिस्त निर्माण झाली. उन्हाळ्याची तीव्रता असतांना देखील अल्लाहच्या भक्तांनी रोजे धरले, प्रार्थना केली. सर्व धार्मिक विधी पार पाडले. विशेष म्हणजे रमजान महिन्यात काय केले पाहिजे, हे अल्लाहने नमूद केले,भक्तांनी स्वतः त्याप्रमाणे आचरण करण्याचा निर्णय घेतला व त्यावर अंमल केला. तहान लागलेली असतांना व समोर पाणी उपलब्ध असतांना त्याला हात ही लावला नाही. हे नियंत्रण स्वतः निर्माण केले. यासाठी कोणताही कायदा करावा लागला नाही. हीच स्वयंशिस्त मानवाला अध्यात्माकडे प्रोत्साहीत करते.
ईश्वराने मानवाच्या भल्यासाठी सर्व प्रकारच्या साधनांची निर्मिती केली. अन्नसेवन करतांना किंवा केल्यानंतर त्रास होऊ नये, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, फळे, कंद आदि उगवले. मानवी शरीराला अपाय होऊ नये, यासाठी अनेक प्रकारच्या जडी-बुटी निर्माण केल्या. निरर्थक अशी एकही गोष्ट या सृष्टीत निर्माण केलेली नाही. मात्र मानवाला त्यांचा योग्य प्रकारे उपभोग घेता आलेला नाही.सृष्टीच्या निर्माण कर्त्या परमेश्वराने सर्व सोयी सुविधा निर्माण केल्या.मात्र आपण त्याचा योग्य विनियोग न करता गैरवापर केल्याने मानव आज अडचणीत सापडला आहे.
अल्लाहने कुरआन शरीफच्या माध्यमातून मानवासाठी आचारसंहिता निर्माण करून दिली आहे. प्रत्येकाने त्याप्रमाणे वर्तन करायचे, वागायचे आहे. आपल्या सर्व कर्माचे ऑडिट कयामतच्या दिवशी होणार आहे. या जगात जीवन जगतांना केलेल्या प्रत्येक चांगल्या-वाईट कार्याचा खाते उतारा (नाम ए आमाल किंवा आमालनामा) आपल्याला त्या दिवशी मिळेल आणि त्याप्रमाणे आपल्याला स्वर्ग कि नरक याचा फैसला झालेला असेल. जे जे चुकीचे केले असेल त्याची परतफेड करावी लागेल. सर्व हिशोब काटेकोर असेल तेथे समायोजन नाही.कारण आपल्या सर्व कार्याचा ऑडिटर अल्लाह आहे.
दुनियेतला ऑडिटर लाच घेऊन तुमच्या बाजूने सकारात्मक अहवाल देईल, मात्र तो जगाचा ऑडिटर कोणतीही लाच घेत नसल्याने तो अहवाल जसा येईल तसा निकाल आपल्याला मान्य करावा लागेल. म्हणून प्रत्येकाने सचोटीचा स्विकार करावा व त्याप्रमाणे जीवनक्रमण करावे हाच एकमेव पर्याय आहे.
या वर्षी रमजानुल मुबारक या लेखमालेद्वारे दैनिक कॉमन न्यूज, दैनिक शासन दरबार, दैनिक तुफान क्रांती, दैनिक जलभूमी तसेच राज्यातील अनेक न्यूज पोर्टल च्या माध्यमातून इस्लाम धर्माबद्दलची माहिती इतर धर्मिय बंधू भगिनीपर्यंत पोहोचवून इस्लामचा खरा परिचय करून देण्याचा अल्पसा प्रयत्न मी केला. गेली २७ वर्ष मी रमजान महिन्यांमध्ये हे लेखन करीत आहे.
या लेखमालेस वाचकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा खऱ्या अर्थाने संस्मरणीय आहे. सोशल माध्यमामुळे चांगल्या विचारांची देवाण-घेवाण करण्यास मोठा हातभार लागला आहे. राज्यातून देशातून नव्हे तर परदेशातून सुद्धा अनेक मित्रांनी या लेखमालेबद्दल प्रशंसा केली आहे. राज्यातील अनेक वाचकांनी गेल्या महिन्याभरामध्ये फोन करून इस्लाम धर्माबद्दलच्या अनेक संकल्पना समजून घेतल्या. शंका निरसन करून घेतले. इस्लाम धर्म आणि मुस्लिम संस्कृतीबद्दल अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणामध्ये जाणीवपूर्वक निर्माण केले गेले आहेत, हे सुद्धा त्यांना जाणवले.
जगातील कोणताच धर्म द्वेष, मत्सर, राग शिकवीत नाही. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यांमध्ये हिंदू मुस्लिम गेल्या अनेक वर्ष एकोप्याने राहत आहेत, अनेक कुटुंबांमध्ये सख्ख्या नात्यांपेक्षा जास्त जवळीकीचे संबंध आहेत. एकमेकांच्या सुख- दुःखामध्ये हिरीरीने सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने बंधुभाव जपणारी आपली संस्कृती अजूनही अबाधित आहे, याची प्रचिती या निमित्ताने आली.
अलीकडच्या काळात राजकारणामध्ये धर्माचा वापर सुरू झाल्यापासून काही प्रश्न निश्चितपणे निर्माण केले गेले आहेत, परंतु या गोष्टी फार काळ टिकत नाहीत, याची जाणीव आता सर्वांना होत असल्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांच्या हातात हात घालून जगणारी आपली माणसं पुन्हा एकदा दृष्टीने सामाजिक भान ठेऊन एकमेकाला सहकार्य करीत आहेत, ही आनंदाची बाब आहे. (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082