संयम - रोजाचा स्थायीभाव
रमजान महिन्याचा दुसरा अशरा आता सुरु झाला आहे.दैनंदिन दिनक्रम आता स्थिर झाला आहे. उन्हाळ्याचा त्रास ही काही अंशी अंगवळणी पडला आहे. सध्या विचित्र वातावरणाचा अनुभव आपण घेत आहोत. सकाळी थंडी, दुपारी ऊन, संध्याकाळी परत थंडी, काही अंशी ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा फारसा त्रास सध्या तरी जाणवत नाही. ही सुद्धा परमेश्वराची कृपाच म्हणावी लागेल.
पूर्वी मंदिरे, मशिदी या कच्च्या होत्या, मात्र भक्ति करणारे भक्त पक्के होते. आता खूप बदल झालाय.रात्रीच्या तरावीह च्या नमाजमध्ये स्लॅबमध्ये होणाऱ्या उकाड्याची तीव्रता कमी करण्यासाठी मशिदींमधून कुलरची व्यवस्था तातडीने करण्यात आली आहे. प्रार्थना करतांनाही आरामात विना त्रास करण्याची प्रवृती वाढत आहे. आपण उन्हाळ्याची थोडीशी तीव्रता सहन करु शकत नाही, ,मग जे रात्रंदिवस भट्टी समोर उभे राहून कार्य करतात ते कसे सहन करीत असतील त्यांची जाणिव यानिमित्ताने सर्वांना होत असेल.
रमजान महिन्यातील रोजे म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे. संयम (सब्र) निर्मिती हा देखील रोजाचा स्थायीभाव आहे. म्हणूनच रमजानला सब्र का महिना असे ही म्हटले जाते. रमजान मध्ये उपवास सुरू केल्यानंतर आपण स्वतःच काही बंधने आपल्यावर लादून घेत असतो. एकदा पहाटे सहेरी खाण्याची वेळ संपल्यानंतर सूर्यास्तापर्यंत काही ही न खाण्याचा निश्चय स्वतःच करीत असतो. हीच स्वयंशिस्त आपल्यामध्ये संयम निर्माण करते. उपवास केल्याने भुकेल्याची अवस्था, तहानलेल्यांची व्याकुळता याची जाण आपल्यात निर्माण होते. ज्यांना वेळेवर खायला अन्न मिळत नाही, त्यांची काय अवस्था होत असेल याची जाणिव निर्माण होते. जे तहानलेले असतात त्यांच्या प्रती सहानुभूतीची भावना निर्माण होते. आपल्याला सर्व सुखे प्राप्त आहेत, परंतु या जगात जे दीन आहेत, गरीब, अनाथ आहेत ते आपले जीवन कसे जगत असतील, याची जाणिव रोजामुळे निर्माण होते.
एकदा रोजा धरल्यानंतर सायंकाळपर्यंत आता काहीही सेवन करायचे नाही, अन्यथा ईश्वर नाराज होईल ही भिती मनात बाळगून आपण मगरीबची वेळ होण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. अकरा महिने मगरीब आपली वाट पाहते, पण या महिनाभर आपण मगरीबची प्रतिक्षा करीत असतो. एक मिनीट जरी इफ्तारला वेळ असेल व आपल्याला कितीही तहान लागलेली असली तरी आपण समोरच्या पाण्याच्या ग्लासला हात लावीत नाही, स्वयंशिस्तीचे यापेक्षा दुसरे उत्तम उदाहरण शोधूनही सापडणार नाही.
समाजातील जे गरजू घटक आहेत, त्यांच्या गरजांची जाणिव व्हावी व या गरजा पूर्ण करण्याची भावना आपल्यात निर्माण व्हावी, हा रोजाचा मूळ उद्देश आहे. रोजाच्या माध्यमातून ईश्वरी आदेशांचे पालन करुन आपले वर्तन सदाचारी करण्याबरोबरच आपल्या स्वच्छंदी आचरणाला लगाम घालून स्वतःच स्वतःवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न रोजेदार हा करीत असतो.रोजा धरल्यानंतर रोजदार म्हणून आपल्याला जे काही अनुभवायला मिळते ते सर्व इतरांच्या बाबतीतही घडत असते आणि म्हणून त्याची जाणीव होऊन अशा घटकांना मदत करण्याची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण व्हावी, हा रोजा मागचा मूळ उद्देश आहे. (क्रमशः)
🟣■🟣■🟣■🟣■🟣
रमजानुल मुबारक - १३
वृद्धाश्रम कशासाठी ?
या जगाचा स्वामी ज्याला आपण ईश्वर, परमेश्वर किंवा अल्लाह म्हणतो. तो या जगाचा दाता आहे व त्याच्या मर्जीनुसार जगाचा कारभार होत असतो. सर्व भावना तोच निर्माण करतो. दैनंदिन जीवन जगत असतांना प्रत्येकाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. प्रत्येक व्यक्तिच्या काही ना काही ईच्छा, आकांक्षा, अपेक्षा, ध्येय, उद्दिष्टे असतात. यांच्या प्राप्तीसाठी तो सर्व प्रकारच्या मार्गाचा अवलंब करीत असतो. पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, पैसा, मान, सम्मान या बाबींसाठी सर्व काही करण्याची त्याची तयारी असते. इस्लाम धर्मात मात्र यापैकी एकाही गोष्टीला थारा नाही, कारण या सर्व गोष्टी अल्लाहकडून मिळणाऱ्या असतात.
तुमच्या नशिबात असतील तर मिळतील, अन्यथा तुम्ही किती ही प्रयत्न केले तरी व्यर्थ. कुरआन शरीफ मध्ये अल्लाहने म्हटल्याप्रमाणे या दुनियेत आपण सर्व मुसाफिर आहोत. या दुनियेनंतरची अजून एक दुनिया आहे जेथे आपण कायम वास्तव्य करणार आहोत. येथे जगतांना केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब आपणास तेथे दयावा लागणार आहे. त्या नुसारच स्वर्ग कि नरक म्हणजे जन्नत कि दोजख किंवा जहन्नुम याचा निर्णय होईल. आपल्या मनातील स्वैर ईच्छांना लगाम घालण्याचे काम रोजा करतो तर रमजान मधील रात्रीच्या जादा नमाज रुपी प्रार्थनेतून ईश्वराची आराधना करण्याचे कार्य केले जाते.
रोजा मध्ये तीव्र ईच्छा असून ही आपल्या मूलभूत गरजा असलेल्या भूक व तहान यावर आपण स्वतःच नियंत्रण ठेवतो. जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तो ईतर गोष्टींवर ही जय मिळवू शकतो. अल्लाहची श्रध्दा व भिती हे कार्य करण्यास सहायभूत ठरते. रात्रीची जादा प्रार्थना नमाजे तरावीहच्या रूपाने अल्लाहच्या आदेशांचे स्मरण करून आपल्यात एकाग्रता निर्माण करते. मनमानी जीवन न जगता रबचाही जीवन जगण्याची प्रेरणा या प्रार्थनेतून मिळते व जन्नत (स्वर्ग) प्राप्ती जे आपले ध्येय आहे याकडे वाटचालीचा मार्ग सुकर करण्याचे कार्य रमजान महिन्यात घडते.
मुळात या दुनियेत जगतांना आपण कसे जगावे, याची आदर्श आचारसंहिता अल्लाहने कुरआन शरीफ च्या माध्यमातून आपल्याला दिली आहे.त्यातील मार्गदर्शनानुसार आपण वागल्यास आपले जीवन सफल होणार आहे. कुरआन मध्ये जीवनाच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे सामावलेली आहे. उदाहरणार्थ मातापिता (वालदैन) यांचे संदर्भात कुरआन मध्ये अल्लाहने म्हटले आहे कि, तुमचे मातापिता वृध्द(बुढे) झाल्यास त्यांना झिडकारू नका, त्यांच्याशी उंच आवाजात बोलू नका, त्यांना त्रास होईल, असे वागू नका. तुमच्या बालपणी त्यiनी खूप कष्ट घेऊन तुमचे संगोपन, पालनपोषण केले आहे, तेव्हा त्यांचा योग्य सन्मान राखणे, त्यांच्याकडे लक्ष देणे ही आता तुमची जबाबदारी आहे. कुरआन मधील ही शिकवण प्रत्येकाने अंगिकारल्यास जगात वृध्द आश्रम दिसणारच नाहीत.
आज अनेक कुटुंबामध्ये आई-वडिलांकडे दुर्लक्ष होताना दिसते. पत्नीचे ऐकून आपल्या आईला त्रास देणारे महाभाग खूप आहेत, परंतु त्यांनी आई आणि पत्नी यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या आई-वडिलांनी आपल्यासाठी अपार कष्ट घेतले. रात्रंदिवस त्रास सहन करून आपल्याला वाढवले, शिक्षण दिले, नोकरीला लावले किंवा व्यापाराला लावले, अशा आपल्या आई-वडिलांना त्यांच्या उतार वयामध्ये आपल्याकडून कोणताही त्रास होणार नाही, त्यांचे मन दुखावले जाणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी. याबाबत आपण इतरांना उपदेश करतो, मात्र स्वतःच्या आई-वडिलांना नको तो त्रास देतो, ही बाब योग्य नाही. (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082