विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरु
शहरात ३६ ठिकाणी शिबिराचे आयोजन
सोलापूर : केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी ‘मोदी गॅरंटी व्हॅन’ शहरात दाखल झाली असून ‘विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुस-या टप्प्याला तुळजापूर नाका येथून काल सायंकाळी सुरुवात करण्यात आली. ही यात्रा शहरातील ३६ ठिकाणी २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे, अशी माहिती उपायुक्त मच्छिंद्र घोलप व क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली.

केंद्र शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना पर्यंत पोहोचावी तसेच त्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ शिबिराच्या माध्यमातून व्हावा हा या संकल्प यात्रेचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, उज्वला योजना व आधार कार्ड संदर्भात माहिती आणि प्रत्यक्ष लाभ देण्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ऑडिओ-विडीओच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. माननीय पंतप्रधान यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी सेल्फी बुथ उभा करण्यात आला आहे. शासकीय योजनांची माहिती पुस्तिका, कॅलेंडर जनतेसाठी व्हॅनसोबत उपलब्ध करण्यात आली आहे.
‘विकसित संकल्प यात्रेतील मार्गावरील सकाळ व सांयकाळसाठी पुढीलप्रमाणे शिबिरे होणार आहेत- गुरुवारी, ०८ फेब्रुवारी रोजी ओम गर्जना चौक व मरीआई चौक, ९ फेब्रुवारी रोजी बलिदान चौक, व गुरुनानक चौक, १० फेब्रुवारी रोजी बुधवार पेठ व सोमवार पेठ, ११ फेब्रुवारी रोजी शेळगी गावठाण व गांधी नगर,
१२ फेब्रुवारी रोजी भवानी पेठ व कन्ना चौक, १३ फेब्रुवारी रोजी लक्ष्मी नारायण थियेटर व नीलम नगर, १४ फेब्रुवारी रोजी दत्त नगर व जुना संतोष नगर, १५ फेब्रुवारी रोजी आदित्य नगर व वाय चौक, १६ फेब्रुवारी रोजी समाचार चौक व केंद्रीय विद्यालय मोदीखाना, १७ फेब्रुवारी बेडर पूल व आदर्श नगर, १८ फेब्रुवारी रोजी प्रबुध्द भारत चौक व आयोध्या नगर, १९ फेब्रुवारी जुना विडी घरकुल व बागवान चौक, २० फेब्रुवारी रोजी भवानी पेठ व आशा नगर,
२१ फेब्रुवारी रोजी मार्केंडेय नगर व भारतमाता नगर, २२ फेब्रुवारी रोजी राजस्व नगर व मॉडेल कॉलोनी, २३ फेब्रुवारी रोजी सुंदरम नगर व नेहरू नगर, २४ फेब्रुवारी रोजी तुळजापूर वेस व कुंभार वेस आणि २५ फेब्रुवारी रोजी गेंट्याल चौक व साईबाबा चौक याठिकाणी कार्यक्रम होणार आहे.
नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव यांनी केले आहे. उदघाटन कार्यक्रमासाठी समाजविकास अधिकारी सिद्धराम मेंडगुदले, सुवर्णा पाटील, लक्ष्मीकला वनगा, प्रभाकर डूगम, शिला वाघमारे, जे. एम. हन्नुरे आणि साईराज राउळ आदी उपस्थित होते.