Type Here to Get Search Results !

... आजचे चिमुकले विद्यार्थी उद्या 'कर्ण' इतकं नाही तरी गाजरे कुटुंबीयांसारखं दानशूर नक्की बनतील !

 


सोलापूर : " देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता-घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातही घ्यावे" अशी एक म्हण आहे. या म्हणीची काही अंशी प्रचिती सोमवारी शालेय विद्यार्थ्यांनी अनुभवली. निमित्त होतं, गाजरे परिवाराच्या शेतावर त्यांनी आयोजित केलेल्या वनभोजनाचे !  गाजरे कुटुंबीयांनी या आडून सकल समाजापुढे जो एक आदर्श ठेवला आहे, त्यातून प्रेरणा घेऊन आजचे चिमुकले विद्यार्थी उद्या 'कर्णा' सारखं नाही जमलं तरी गाजरे कुटुंबीयांसारखं दानशूर नक्की बनतील, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केलीय.



हे संस्मरणीय वनभोजन आयोजित करण्यात आलं होतं, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव शिवारात गाजरे यांच्या शेतात... विद्यार्थी होते, जिल्हा परिषद शाळा कासेगाव चे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे... त्या शेतात या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही पिकनिकच्या नावाखाली वनभोजन केलंच होतं. गाजरे भावंडांनी विद्यार्थ्यांना वनभोजनासाठी त्यांच्या मळ्यात आणण्याचा शिक्षकांकडे आग्रह धरलेला होता. यापूर्वी दोन वेळा गाजरे मळ्यात जाऊन आल्यामुळे विद्यार्थ्यांना इतरत्र घेऊन जाण्याचा मानस शिक्षकांचा होता, मात्र गाजरे परिवाराच्या हट्टामुळं तिसऱ्या वर्षाचं वनभोजन गाजरे मळ्यातच आयोजित करण्यात आलं.




सोमवारी, जि.प .प्रा शाळा, कासेगांव ची वनभोजन सहल" गाजरे मळा कासेगाव" येथे निघाली. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मुलं आपल्या शेतात नेहमीच जातात. त्यात नाविन्य नसतं. संपूर्ण शाळेचे विद्यार्थी एकत्रितपणे वनभोजनाला निघणे, हे आनंदाची पर्वणी ठरणार होतं. मुलं शेतातून, बांधावरून गाणी गात, घोषणा, टोप्या-बुट गणवेशात निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत रानातल्या फुलपाखरासारखं पोहोचली मळ्यात... ! 




गाजरे मळ्याचं सौंदर्य द्राक्षे, पेरू, चिकू,अंजीर, आंबा कितीतरी फळांच्या झाडांनी फुललेले आहे. वर्षभर ही ना ती फळं, त्या फळझाडांची श्रीमंती दाखवतच असतात. त्यांनी सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांचं रांगोळी, फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत करून केलं होतं, तसंच स्वागत यावर्षी त्यांनी केलं. नांवांतच गोडवा असणारी ही माणसं ' गाजरा ' हूनी गोड अनुभवली.




फळझाडांच्या गर्द सावलीत बसून मुलांनी आधी डबा फस्त केला. त्यानंतर रंगला विविध खेळांचा डाव... मनोरंजानात्मक खेळातून व्यायामाबरोबरच निकोप स्पर्धा पार पडल्या. मुलीतून हर्षदा रोकडे ही सर्व स्पर्धात प्रथम आली तर मुलांमध्ये ओम भोज आणि रुद्र यांनं बाजी मारली. टांगलेली जिलेबी खाणे या अनोख्या खेळात तर जणू हास्याचे फवारे उडाले. 




स्पर्धा आणि मनोरंजनाचा आनंद लुटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गाजरे बंधूनी भोजनाची व्यवस्था केली होती. दाल-चावलसोबत फक्कड जिलेबी... असा हा मेनू !   एवढ्यावरच न थांबत सर्व मुलांनी पेरू आणि चिकू या रानमेव्याचा आस्वाद ही मनसोक्त चाखला, काहींना ते संपवणं अशक्य होतं, त्यांनी ते पिशवीत भरले. खरंच दानत घ्यावी तर गाजरे बालाजी, संभाजी अन् ज्ञानेश्वर भावंडांकडूनच... !




इतका पाहुणचार घेतल्यानंतर मनात सहजच कृतार्थ भाव जागा होतो, खरोखरच  गाजरे परिवाराचा आभार मानावे तितके कमीच होतं, अन् हे कमी होतं म्हणून की काय... त्यांनी पुढच्या वर्षीचंही 'आवतण'  देऊन टाकलं. गाजरे वहीनींनी तर अक्षरशः मुलांचे खरकटे हातसुद्धा धुतले. खरंच धन्य ती माऊली... ! सर्व कुटुंबीय यासाठी दिवसभर  झटत होतं, हाती पडेल ते काम करत होतं, जणू दातृत्व अन् सेवेचा हा कृती पाठच होता. आम्हा सर्वांपुढे एक आदर्श निर्माण केला. मुलांनी गीत आणि नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. 


असे क्षण अनुभवले की," शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात, किती आपलं भाग्य असतं, जेव्हा ती आपली असतात " आज या शब्दसमूहाचा अर्थ वास्तवात अनुभवत शेवटी सर्वांचे आभार मानून वनभोजन पूर्णत्वास गेले अन् सर्व विद्यार्थी सांजवेळी परतीच्या वाटेवर निघाले. गाजरे कुटुंबीयांनी या आडून जो एक आदर्श सकल समाजापुढे पुढे ठेवला, त्यातून प्रेरणा घेऊन आजचे चिमुकले विद्यार्थी उद्या 'कर्णा' इतकं नाही, जमलं तरी गाजरे कुटुंबीयांसारखं दानशूर नक्की बनतील, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केलीय.