जिजाऊ ज्ञानमंदिर संकुलातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
कोंडी : सध्या स्पर्धेच्या युगामध्ये फार मोठी स्पर्धा निर्माण झालेली असताना विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलानी आपल्यासाठी केलेली मेहनत, आपल्यासाठी केलेला त्याग लक्षात ठेऊन वाटचाल केल्यास निश्चितच यशाला गवसणी घालता येईल, असं प्रतिपादन प्रा. संजय जाधव यांनी केले.
जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, जिजाऊ मंदिर कोंडी संचलित जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूलमधील दहावीच्या आणि याच संकुलातील विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ झाला. याप्रसंगी प्रा. जाधव बोलत होते.
शेतकरी, कष्टकऱ्यांची मुलं शिकावी, ग्रामीण भागातील मुलींनाही उच्च शिक्षणाची संधी आपल्या गावात उपलब्ध व्हावी, या उदात्त भावनेतून संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ यांनी हे फार मोठे संकुल उभं केलं आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थापकाच्या महाविद्यालयामध्ये आपण शिक्षण घेत असल्यामुळे निश्चितच आपणही आयुष्यामध्ये देशाने मला काही दिले, यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो, याचा विचार करून आपण कार्यरत राहावे, असे आवाहन प्राध्यापक जाधव यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादासाहेब नीळ यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. विश्वनाथ उपाध्ये यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.