Type Here to Get Search Results !

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर अनुकरणीय विचार


महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर अनुकरणीय विचार

"आम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे दायाद आमच्या देशासाठी, भारतीय समाजासाठी, आणि सर्व प्राणिमात्राच्या हितासाठी ... वायुप्रदूषण, ध्वनी प्रदुषण, जलप्रदूषण, त्याच प्रमाणे विचार प्रदूषण करणारे कुठलेही कृत्य करणार नाही" क्षमस्व !

मी अनेक वर्ष चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्याला अभिवादन करण्यासाठी महामानवाच्या महानिर्वाण दिनी आलो.


दर वर्षी अभिवादन करण्यासाठी गर्दीचा उच्चांक पाहून मनाला धन्यता वाटते, परंतु आलिकडे ज्या काही गोष्टी निदर्शनास येवू लागल्या आहेत त्या पाहून मन खिन्न होते.  आमचे लोक आपल्या मागासलेपणाच्या (मुद्दामहून हा शब्द प्रयोग करीत आहे क्षमस्व)  पाऊलखुणा मागे सोडून जातात, त्या थोडक्यात मी पुढे सांगणार आहे. काही वर्षे झाली शासनाच्या वतीने खूप उत्तम सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत, त्याची तयारी आठ दहा दिवस अगोदरपासून चालू असते. नियोजनात असलेली माणसे व शासकीय यंत्रणा राब -राब राबतात. नियोजनाची इतंभुत माहिती सर्वांना दिली जाते तरी ही काही गोष्टी निदर्शनास येतात, त्यापैकी आपला असमंजसपणा, आडमुठेपणा, नाकर्तेपणा आणि मनातील अनादरपणा. 

      
या वरील चार बाबी सुधारणा करण्याजोग्या आहेत. म्हणून खालील काही मुद्दे लक्षात घेवू.

असमंजसपणा
६६ - ६७ वर्षे होतील, आम्ही डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला लाखोंच्या संखेने येतो. दोन-तीन दिवस दूर दूर वरून प्रवास करून येतो. रेल्वे, बस, प्रायव्हेट गाड्या, घेवून येतो तर काही लोकं पायी सुद्धा येतात.
या मध्ये श्रध्देचा भाग त्याच प्रमाणे मनापासून अभिवादन करण्याचा भाग किती टक्के असतो या कडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले पाहिजे आणि खरोखर उपकार कर्त्याचे अनुकरणीय कार्य करण्यासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण उपयोगात आणण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपणाला याची जाणीव निर्माण करून देता आली पाहिजे चिथावणीखोर घोषणाबाजी नको, डिजे नको, लाऊडस्पिकरचा कर्कश आवाज नको, विचित्र ध्वनी प्रदूषण करणारे आवाज नको, हल्लकल्लोळ नको, गर्दीचा गैरफायदा नको, धक्काबुक्की नको, यात्रेचं स्वरूप नको, चोरी चापटी नको, गरीब व्यवसायिक फूटपाथवर बसलेल्या लोकांच्या वस्तू फुकटात घेऊन जाणे नको, माता भगिनींच्याकडे वक्र दृष्टी नको, विनाकारण पैशांची धूळधाण नको, (मोफत मिळालेल्या) अन्न-पाणी यांची नासधूस नको, रस्त्यावर पायदळी अर्धवट खाऊन टाकलेल्या पत्रावळ्यांचा खच नको, कोठेही लघवी -शौच नको, कोठेही पार्किंग नको, घरापासून चैत्यभूमीपर्यंत रस्त्याने / प्रवासात हुल्लड बाजी नको, चैत्यभूमी आणि एकूणच दादर परिसर अस्वस्थ व्हायला नको, तेथील रहिवाशी असणाऱ्या लोकांच्या दुकानदारांच्या व्यवसायिकांच्या दैनंदिन व्यवहारात अडथळा नको, चैत्यभूमीवर येताना व परत जाताना केवळ बुद्धांची शिकवण डॉ बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण स्मरणात ठेवून या दिवशी शांती शांती आणि शांती श्रद्धायुक्त हृदयात झिरपली पाहिजे.

आडमुठेपणा

चैत्यभूमीवर येताना शासनाने पुरवलेल्या वाहतूक यंत्रणेचा लाभ घेत असताना विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त केले गेली पाहिजे, या सर्व सुख सोईंचा उपयोग करताना सातत्याने सुज्ञपणे आचरण केले पाहिजे, सरकारी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना, व सेवक वर्गाला सन्मानाने वागविले पाहिजे, त्यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाचा आदर केला पाहिजे. विशेष करून पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपला कार्यभाग साधला गेला पाहिजे. अरेरावी, टिंगल टवाळी करत चालणाऱ्या टोळक्यांना पुढाकार घेऊन मज्जाव केला पाहिजे. हा महामानवाला अभिवादन करण्यासाठी निवडलेला दिवस आहे, तो उत्सवासारखा समजता कामा नये, हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आदरांजली वाहण्याचा दिवस होय.

नाकर्तेपणा

चैत्यभूमीच्या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे, पोलीस यंत्रणेला, वाहतूक यंत्रणेला, महानगर पालिका प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, येथे नाकर्तेपणा करू नये. अभिवादन करण्यासाठी निवडलेला मार्ग अवलंबला जावा विनाकारण मध्ये घुसून दर्शनाचा लाभ होतो आणि पुण्य पदरी पडेल या भावनेपोटी लोकांच्या तासनतास रांगांचा अनादर करून नाकर्तेपणाचा कळस करू नका. भाषणबाजी करण्यासाठी राजकीय स्टेज उभारू नका, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी असे देखावे सादर करण्यासाठी त्या जागेचा वापर करून सत्कार्य करा. सेवाभावी संस्था, वैद्यकीय संस्था, मोफत आरोग्य तपासणी केंद्र, मोफत अन्न पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक प्रकारच्या सेवकांना सहकार्य करून आपला सकारात्मक प्रतिसाद देऊन सन्मानित करा. त्यांच्या विषयी अनास्था अनादर व्यक्त करून आपला नाकर्तेपणा सिद्ध होईल, असे वागू नका.

अनादरपणा

महामानवाच्या शिकवणीचा अनादर होईल, असे कृत्य करू नका, सेवा, सुरक्षा, सहकार्य, संयम आणि शांतता या तत्त्वांचा अनादर होईल, असे वर्तन करू नका,  हा दिवस समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि  न्याय  या मौलिक विचारांची पेरणी करणाऱ्या महामानवाच्या महानिर्वाण दिनाच्या साठी आयोजित केला जातो. त्याचा मी अनादर होऊ देणार नाही, अशा विचारांनी प्रेरित होऊन साजरा करण्याची प्रत्येकाने स्वेच्छेने प्रतिज्ञा करा. जगातील हे एकमेव चैत्य असे आहे की ज्या चैत्यावर लाखोंच्या संख्येने लोक अभिवादन करण्यासाठी येतात. म्हणूनच आदर्शवत कृत्य करून खरे खुरे भीम अनुयायी असल्याचे जगाला दाखवून द्या. ज्या महामानवाच्या महानिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला महासागर शांत होतो, विनम्र होतो, आपल्या श्रद्धायुक्त लाटांच्या लडी हळुवार करतो, त्याचा एक प्रकारच्या अभिवादनाचा आदर्श घेऊया !

जयभीम !

                                            जी. आर. गायकवाड, 

                                       देहूरोड,पुणे. 9049412060
(शिवभार : सत्यम संकुल पुणे ग्रुपवर अनिल वंशी यांचं शेअरींग.)