ओळख एका त्वरितेची, शौर्यवतीची....
महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्कार’-२०२३ यावर्षी राज्य पश्चिम बंगाल दार्जिलिंग हिल्समधील पाणिघट्टा येथील रहिवासी असलेल्या श्रीमती प्रिन्स उर्फ रंगूजी सौरिया- संस्थापक, कांचनजंगा उद्धार केंद्र-सिलीगुडी यांना जाहीर झाला आहे. मूळच्या पाणिघट्ट येथील रहिवासी असलेल्या असलेल्या रंगू दार्जिलिंग, ईशान्य भारत आणि नेपाळ मधील लैंगिक तस्करी पीडितांना मदत करण्यासाठी समर्पित असलेल्या सिलीगुडी येथील ‘कांचनजंगा उद्धार केंद्रा’ च्या माध्यमातून जवळ जवळ तीन दशक काम करीत आहेत.
'महिला, अल्पवयीन मुली व मुले यांना लैंगिक शोषणातून मुक्त करण्याच्या’ कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन, त्यांच्या या सामाजिक कार्याकरिता राष्ट्रीय स्तरावरील २८व्या ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने मा. डॉ. नितीश भारद्वाज, माजी खासदार–लोकसभा, प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता यांच्या हस्ते दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं ५.३० वा संस्थेच्या रमा पुरुषोत्तम विद्या संकुल, पुणे येथे सन्मानित करण्यात येणार आहे. एक लाख एक हजार रुपये रोख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रंगूजी सौरिया यांचा जन्म पानिघटा, जि. दार्जिलिंग, राज्य पश्चिम बंगाल दार्जिलिंग हिल्समधील एका सामान्य कुटुंबात झाला. बिहार, ओरिसा, झारखंड, सिक्कीम, आसाम ही राज्य पश्चिम बंगालच्या सीमारेषे वर आहेत तर नेपाल व भूतान हे देश आंतरराष्ट्रीय सीमारेषे वर आहेत. एकूण या राज्यांमधील/देशांमधील दारिद्र्य, शिक्षण व रोजगाराच्या संधी व महिला-मुलींकडे बघण्याच्या दृष्टीकोन तपासल्यास, या भागातील महिला व मुलींची; अगदी कुटुंबातील स्थिती, आपल्याला सहज लक्षात येवू शकते. महिला व मुलींकडे उपभोगाची एक वस्तू म्हणून बघण्याची वृत्ती व यातून लैंगिक तस्करी सारख्या गुन्ह्याची निर्मिती व मशागत करण्यास असे प्रदेश व त्याला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा या नेहमीच पूरक सहकार्य करीत असतात. आज लैंगिक तस्करीची ३९ टक्के इतकी पश्चिम बंगालची आहे. महिला व मुलींची लैंगिक सुरक्षितता राखण्याकरिता आपल्याकडे अनेक कायदे आहेत; मात्र अत्यंत सुसूत्रतेने चालणारे हे रॅकेट व कायद्यातील पळवाटा या गरीब, गरजू, निराधार, अशिक्षित मुलींचे शोषण रोखण्यास असमर्थ ठरतात.
“आजूबाजूला महिला व मुलींचे लैंगिक शोषण होत असताना, आपण या पीडितांकरिता काही तरी केलेच पाहिजे”, याची जाणीव व प्रबळ इच्छा रंगूजींना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होत असतानाच झाली व त्या या कामात सक्रिय होवू लागल्या. महाविद्यालयात शिकत असतानाचं वय हे जबरदस्त हिम्मत आणि जोश असण्याचं वय असतं तसेच परिणामांचा फारसा विचार न करता झोकुन देऊन काम करण्याचं हे वय असतं. या वयात आपल्या मित्र मैत्रिणींना बरोबर घेऊन या कामाची रंगूजींनी सुरुवात केली. काय नेमकं करायचंय कसं करायचंय? हे माहीत नसताना, तस्करीच्या जाळ्यातून मुलींना सोडवलंच पाहिजे या जिद्दीने त्यांनी कामाला सुरुवात केली. तेव्हाचे मित्र आणि त्यांची बहीण आज ही खंबीरपणे त्यांच्या सोबत आहेत हे या कामातील भावनिक आधाराचे महत्त्वाचे सूत्र आहे.
सुरुवातीच्या काळात हा तस्करीचा प्रकार आहे हे प्रशासनाला मान्यच नसल्यामुळे, गुन्हा नोंदवून घेतला जात नसे. मग पुढे जाऊन केस उभी राहणे, आरोपीला शिक्षा होणे या गोष्टी तर फार दूर. प्रशासन, पोलीस यंत्रणेकडून तसेच मुलींच्या कुटुंबियांकडून सहकार्य मिळविणे, त्यासाठी पूरक वातावरण तयार करणे हेच एक मोठे आव्हान या कार्यातील असल्याचे रंगूजी सांगतात. आता परिस्थिती हळु हळु बदलते आहे.अनेक आव्हाने व प्रसंगी जीवावर बेतणारे प्रसंगही हे काम करताना त्यांनी अनुभवले; परंतु या कामातील निष्ठा, कामावरील प्रेम व स्वत:वरील विश्वास त्यांना या कामात अधिकच धीट व खंबीर होण्यास पूरक ठरला.
२००४ मध्ये काठमांडू येथील अनुराधा कोईराला आणि टीम मैती नेपाळ यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी दार्जिलिंग, सिलीगुडी येथे या कामाला समर्पित 'कांचनजंगा उद्धार केंद्र' सुरू केले. हळू हळू या कामाचे महत्त्व समाजाला ही पटले. विशेष म्हणजे आज रंगूजींचे काम पूर्णपणे लोकांच्या मदतीवर चालले आहे. अगदी सिलिगुडी येथे संस्थेची जी वास्तू उभी आहे, त्यासाठी सर्व साहित्य हे लोकसहभागातून प्राप्त झाले. “अशा मदतीतून आपल्यालाही मानसिक बळ मिळतं आणि या कामाची गरज लोकांना पटते आहे याचे समाधान वेगळेच आहे”. असं रंगूजी आवर्जून सांगतात.
दार्जिलिंग हे चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. आसपासच्या अनेक खेड्यापाड्यात राहणाऱ्या अल्पवयीन-तरुण मुली, महिला येथे कामाकरिता येतात. तसेच पंचक्रोशीतील अनेक गावांमधील महिला व मुली रोजगाराच्या शोधात असतात. कधी नोकरीचे आमिष दाखवून, तर कधी चांगल्या आयुष्याची स्वप्ने दाखवीत तर कधी अगदी लग्नाची वचने देत अथवा प्रेमाची भुरळ घालत; मुलींना अगदी सहजपणे लैंगिक तस्करीत (देह विक्रीय) अथवा बंधमजूरीत ओढले जाते व त्यांची विक्री होते. राज्याची अथवा देशाची सीमा ओलांडताच या मुली सहसा पुन्हा कधीच दिसत नाहीत व इथूनच सुरु होते त्यांच्या आयुष्याची वाताहत.
अनेकदा मुलींना सोडविण्यासाठी रंगूजी पुणे, हैद्राबाद, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये गेल्या आहेत. तिथे आधी पाहणी करून, अशा मुली तिथे असल्याची खात्री करून, स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळवून हे जोखमीचे काम त्या करतात. यासाठी मानसिक धैर्य, संयम आणि समयसूचकता असलीच पाहिजे; जी रंगूजींकडे निश्चितच आहे. तसेच त्या त्या ठिकाणच्या सामाजिक संस्था, नेटवर्कस, कार्यकर्त्यांशी उत्तम संपर्क व समन्वय हे ही महत्त्वाचे सुत्र त्या जपतात. पुण्यातील बुधवार पेठेत अडकलेल्या अशा मुलींना सोडविण्यामध्ये फरासखाना पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. या सर्व कार्याकरिता आर्थिक पाठबळ ही भक्कम व नियमित लागते.
त्वरितीने संभाव्य ठिकाणांवर (हॉटेल, रेल्वे/बस स्थानके, सीमारेषा ओलांडणाऱ्या पायवाटा ई) लक्ष ठेवून या मुलींची सुटका करण्याचे काम रंगू आपल्या संस्थेमार्फत करतात. प्रामुख्याने सिक्कीम, उ. बंगाल आणि नेपाळमधील मुलींच्या सुटकेसाठी त्या प्रयत्न करतात. अनेक मुली या आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडत अगदी; अरब देशात विकल्या जाण्याची उदाहरणेही त्या सांगतात. अशा मुलींना या चक्रव्हुयातून सोडविणे एक अवघड व तितकेच आव्हानात्मक काम असते. परंतु रंगूजींनी अगदी सौदी अरेबियातील काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २०११ मध्ये पाच किशोरवयीन मुलींना पुन्हा भारतात आणण्यात यश मिळविले होते.
रंगूजींचा या मुलींना देह व्यापाराच्या सापळ्यातून सोडवण्याचा निर्धार आणि त्याकरिता लागणारे शौर्य पाहून त्यांना २०११ मध्ये गॉडफ्रे फिलिप्स सोशल ब्रेव्हरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. यापूर्वी त्यांना ‘फडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचा वुमन अचिव्हर्स अवॉर्ड २००९’ ने देखील सन्मानित करण्यात आले होते. आज पर्यंत रंगूजींनी वीसहून अधिक प्रादेशिक संस्थांकडून त्यांच्या या कार्याकरिता सन्मानित करण्यात आले आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने दरवर्षी भारतातील विशेष समाज कार्य करणाऱ्या शंभर निवडक महिलांना सन्मानित केले जाते त्यात जानेवारी २०१६ मध्ये रंगूजींचा समावेश करण्यात आला होता.
“हे काम करताना प्रकर्षाने जाणवले ते म्हणजे या दुष्ट चक्रात मुली अडकुच नयेत; यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम करण्याचीही गरज आहे” असे ठाम मत रंगूजी व्यक्त करतात आणि म्हणून त्यांनी प्रबोधनात्मक व प्रतिबंधानात्मक कार्याची सुरुवात गावोगावी सुरु केली आहे. मुलींना सोडवून आणल्यावर त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना व्यावसायिक शिक्षण, कौशल्ये शिकविणे, त्यांच्या उत्पादनांना बाजार उपलब्ध करून देणे या त्यांच्या काही आगामी योजना आहेत. आजपर्यंत रंगूजींने अकराशे हून अधिक महिला-मुलींना या दुष्ट चक्रातून मुक्त केले आहे. यापुढेही हे कार्य करीत राहणार असा ठाम निश्चय मांडणाऱ्या रंगूजी सौरिया यांच्या कार्याला शतश: प्रणाम व वंदन!
स्मिता बाळकृष्ण कुलकर्णी,
(लेखिका महर्षि कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत)
.....
बाया कर्वे पुरस्कार – माहिती
१२५ वर्षापूर्वी भारतरत्न महर्षी कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या शताब्दी वर्षापासून म्हणजेच १९९६ पासून सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘बाया कर्वे पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. समाजाच्या उत्थानाकरीता एखाद्या सामजिक प्रश्नाचा पाठपुरावा करीत, त्या प्रश्नावर असामान्य व अव्दितीय असे प्रेरणादायी कार्य उभ्या करणाऱ्या महिलांचा सन्मान यानिमिताने संस्थेमार्फत केला जातो. या कामासह, या महिलांनी या कार्य उभारणीत पेललेली आव्हाने व अडचणींची ही विशेष ओळख; यानिमित्ताने समाजाला करून दिली जाते.
या पूर्वीच्या बाया कर्वे पुरस्कारांच्या मानकरी
कै. गंगूताई पटवर्धन, कै. निर्मलाताई पुरंदरे, कै. विजयाताई लवाटे डॉ. मंदा आमटे, श्रीम. नसिमा हुरजुक, श्रीम. पुष्पा नडे, श्रीम. प्रेमा पुरव, श्रीम. लीला पाटील, श्रीम. सुनंदा पटवर्धन, श्रीम. रेणू दांडेकर, डॉ. स्मिता कोल्हे, श्रीम. मीना इनामदार, श्रीम. सिंधुताई अंबिके, डॉ. माया तुळपुळे, श्रीम.पद्मजा गोडबोले, श्रीम. मीरा बडवे, श्रीम. अनुराधा भोसले डॉ. संजीवनी केळकर, श्रीम. जयश्री काळे, श्रीम. सुवर्णा गोखले, श्रीम. सुनीता गोडबोले, श्रीम. चंद्रिका चौहान, श्रीम. रूषाताई वळवी, श्रीम. जया तासुंग मोयोंग.
.....