सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करण्याची फार मोठी क्षमता असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे जिल्ह्यात १८०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे सोलापूरच्या सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचा लाभ घेण्यासाठी महावितरण आणि महापारेषणने यंत्रणा सज्ज करावी, अशी सूचना एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी सोमवारी,२७ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे केली.
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार शहाजी पाटील, महापारेषणचे संचालक संदिप कलंत्री, महावितरणचे विभागीय संचालक अंकुश नाळे आणि मुख्य अभियंता सुनील पावडे उपस्थित होते.
त्यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार व राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारच्या कामामुळे सोलापूरच्या पारंपरिक दुष्काळी भागात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होत आहे. त्यासोबत शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी विजेची मागणी वाढत आहे. हे ध्यानात घेता नव्या मागणीनुसार महावितरणची यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे.
आमदार सुभाष देशमुख व शहाजी पाटील यांनी वीज ग्राहकांच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती आणि क्षमता वाढविणे, शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणे आणि नवीन उपकेंद्रे उभारणे यावर त्यांनी भर दिला.
विश्वास पाठक म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने राज्यात राबविण्यात येणाऱ्या ४२ हजार कोटी रुपयांच्या आरडीएसएस योजनेत वीज जाळे मजबूत करण्यात येत आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यात साडेतीन हजार कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या बहुतेक समस्यांवर या योजनेमुळे तोडगा निघेल.
संदीप कलंत्री व अंकुश नाळे यांनी उपस्थित वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सुनील पावडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या कामगिरीचे सादरीकरण केले.