Type Here to Get Search Results !

शासनाला वंचित बहुजन आघाडीचा इशारा


शेतकऱ्यांचं कांदा अनुदान द्या; अन्यथा आंदोलन 

सोलापूर : फेब्रुवारी २०२३ मध्ये कांद्याचे भाव प्रचंड प्रमाणात खाली आले होते. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकर्‍याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यावेळी विकलेल्या कांद्याला ३५० रूपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते. ते शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, तालुकाध्यक्ष शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.


शासनाच्या घोषणेनंतर ६ महिने उलटून गेले, अद्याप एकाही शेतकर्‍याला जाहीर अनुदान दिले नाही. ऑगस्टअखेर आला तरी पाऊस पडला नाही. दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तरी कांद्याला जाहीर करण्यात आलेले अनुदान शेतकर्‍यांना लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी गाजरे, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते संतोष माळी, जिल्हा संघटक उस्मान शेख, दक्षिण सोलापूर तालुका महासचिव सचिन जाधव, ज्योती क्रांती परिषदेचे प्रा. रणजीत जाधव, विश्वनाथ खारे, कासेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उमेश काळे, मानकेश्वर वाघे आदींसह वंचित बहुजन आघाडी आणि ज्योती क्रांती परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

शेतकर्‍याचे कांदा अनुदान लवकरात लवकर शासनाने जमा करावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे सोलापूर जिल्हा महासचिव अमोगी तेलंग यांनी दिला.