बज्म-ए-गालिबतर्फे ज्येष्ठ साहित्यिक बशीर परवाज यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली
‘बशीर परवाज यांच्या निधनाने उर्दू साहित्यात मोठी पोकळी’ : इरफान जाफरी
‘कविता जगणारे आणि कवितेच्या संवर्धनासाठी आयुष्य समर्पित करणारे बशीर परवाज’ : हेमकिरण पत्की
सोलापूर : बशीर परवाज केवळ साहित्यिक नव्हते, तर सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक आदर्श शिक्षक होते, असं प्रतिपादन शहर काझी सय्यद अमजद अली काझी यांनी केले.
ज्येष्ठ उर्दू साहित्यिक, कवी, लेखक, संपादक, नाटककार तथा बज्म-ए-गालिब, सोलापूरचे अध्यक्ष बशीर परवाज यांच्या निधनानिमित्त बज्म-ए-गालिबतर्फे त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आली होती. इस्लामी व फलाही तंजीमचे अध्यक्ष सय्यद याकूबली खतीब सभेच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत शहर काझी सय्यद अमजद अली काझी यांनी बोलत होते.
प्रोग्रेसिव्ह हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा बजावल्यानंतर ते 2002 मध्ये सेवानिवृत्त झाले. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आणि संस्कारांची ज्योत प्रज्वलित करण्याबरोबरच त्यांनी उर्दू भाषा व साहित्याच्या संवर्धनासाठीही आयुष्यभर कार्य केले. बशीर परवाज यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही शहर काझी सय्यद अमजद अली काझी यांनी यावेळी केला.
यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी बशीर परवाज यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या श्रद्धांजली सभेस मुंबईचे ज्येष्ठ उर्दू कवी इरफान जाफरी, बशीर परवाज यांचे पुत्र अतहर परवेज दौलताबादी व नोमान दौलताबादी, बंधू मीर अफझल मीर, त्यांच्या कन्या व कुटुंबीयांसह अॅड. अर्शद जनवाडकर, मौलाली लोकापल्ली, मोहम्मद हुसेन बक्षी, नासिरुद्दीन आलंदकर, युसुफ आलम सिद्दिकी, अब्दुस शकूर शऊर, अब्दुल गफार शेख, डॉ. हारून रशीद बागवान, इरफान कारीगर, वकार शेख, साहिर नदाफ, राजा बागवान, सय्यद इक्बाल, जाफर बांगी, अॅड. बांगी, मोहम्मद रफी खान, गुलबर्गा येथील चांद अकबर, मुख्तार अहमद दखनी, तालिब सोलापुरी, अशफाक सातखेड, वजाहत अब्दुल सत्तार, हबीब नागपुरी, शादान पितापुरी, रफी नवाज, मुजम्मिल शेख, इसाक बटघर, महमूद नवाज जहांगीरदार आदींसह उर्दू भाषा व साहित्याशी संबंधित अनेक साहित्यिक, कवी, लेखक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हारून रशीद बागवान यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आसिफ इकबाल शेख यांनी केले. नासिरुद्दीन अशरफी यांनी नात-ए-पाकचे पठण केले, तर मीर अफझल मीर यांनी मुनाजात सादर केली. शेवटी मोहम्मद हुसेन बक्षी यांनी आभार प्रदर्शन केले.
***
... चौकट
बशीर परवाज यांच्या कार्यातून सोलापूरच्या साहित्यिक वातावरणाला सातत्याने मिळत राहिली ऊर्जा : ज्येष्ठ कवी हेम किरण पत्की
बशीर परवाज हे केवळ कविता लिहिणारे कवी नव्हते, तर ते कविता जगत होते. कवितेच्या संवर्धनासाठी आणि उर्दू साहित्याच्या विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्यातून सोलापूरच्या साहित्यिक वातावरणाला सातत्याने ऊर्जा मिळत राहिली, असे ज्येष्ठ कवी हेम किरण पत्की यांनी सांगितले.
बशीर परवाज यांनी बज्म-ए-गालिबच्या माध्यमातून सोलापुरातील उर्दू साहित्य चळवळीला समृद्ध करण्यासाठी आयुष्यभर अथक प्रयत्न केले. कवी, लेखक, संपादक आणि नाटककार म्हणून त्यांनी उर्दू साहित्याच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. बशीर परवाज यांच्या व्यक्तिमत्त्वातील कवी आणि साहित्यसेवक या दोन्ही पैलूंना उजाळा देताना, त्यांच्या साहित्यसेवेची आणि संस्थात्मक कार्याची उर्दू साहित्यविश्वात कायम स्मरणीय नोंद राहील, अशी भावना ज्येष्ठ कवी हेम किरण पत्की यांनी यावेळी व्यक्त केली.
---
... चौकट
बशीर परवाज यांच्या निधनाने उर्दू साहित्यविश्वात निर्माण झाली मोठी पोकळी : ज्येष्ठ उर्दू कवी इरफान जाफरी (मुंबई)
बशीर परवाज यांच्या निधनाने उर्दू साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या जाण्याने सोलापूरच्या साहित्यिक चळवळीचीही मोठी हानी झाली आहे, अशी भावना ज्येष्ठ उर्दू कवी इरफान जाफरी (मुंबई) यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी ज्येष्ठ उर्दू कवी इरफान जाफरी यांनी बशीर परवाज यांच्याशी असलेल्या कौटुंबिक व साहित्यिक संबंधांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या वडिलांचे आणि बशीर परवाज यांच्या वडिलांचे सोलापूरशी असलेले जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध होते, असे सांगत त्यांनी त्या आठवणी जाग्या केल्या.
---

