सोलापूर : 'चाचा नेहरू बालमहोत्सव’ हा केवळ क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम नसून सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उत्सव आहे, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना, कौशल्यांना, धैर्याला वाव मिळण्यासाठी हा बाल महोत्सव महत्त्वपूर्ण असतो, यामध्ये उत्साहाने सहभागी होणे सर्वात महत्त्वाचे असते. या बाल महोत्सवामुळे मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळेल, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने पहिला राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विभागीय उपआयुक्त संजय माने, कृष्णा राठोड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय खोमणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, बाल विकास प्रकल्प अधिकारी भुजंग चिंताकोटे, सिंहगड कॉलेज संचालक संजय नवले, बाल कल्याण समिती अध्यक्ष समीर सय्यद, सदस्य सुवर्णा कोकरे, बाल न्याय मंडळ सदस्य गीता तोतकुल यांच्यासह मान्यवर, अधिकारी-कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, क्रीडा हे एक सांघिक खेळ असून त्यामुळे स्फूर्ती, शिस्त, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते. "मुलांनो ,तुम्ही मैदानावर हरले तरी चालेल, पण आयुष्यात कधीही हार मानू नका, आपल्या कर्तृत्वातून आपली ओळख निर्माण करावी राज्यातील पहिलाच ‘चाचा नेहरू बाल महोत्सव’ सोलापुरात होत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
राज्यस्तरीय बालमहोत्सव घेण्याचा पहिला मान सोलापूरला मिळाला, ही आनंदाची बाब असून अनाथ मुलांना त्यांच्यातील कला-गुणांना वाव मिळावा तसेच अनाथ मुलांचे भवितव्य उज्वल व्हावे, हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त संजय माने यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व चाचा नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालविकास विभागीय उपायुक्त संजय माने यांनी केले.
या महोत्सवासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या राहण्याची व खाण्याची, मैदानाची सुविधा दिल्याबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूट चे संचालक संजय नवले यांचा सत्कार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केला.
जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजय खोमणे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले, तर सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण कक्ष रेश्मा गायकवाड यांनी केले.
***
