महाड/प्रतिनिधी : चवदार तळे... ! महाड क्रांतीच्या शताब्दी वर्ष (2026 -2027) निमित्त सार्थक साहित्य प्रकाशन यांच्या वतीने “क्रांती सूर्याचं देणं” या विशेष ऐतिहासिक काव्यसंग्रहासाठी राज्यभरातील कवींना कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“क्रांती सूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर आधारित हा काव्यसंग्रह समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या महान लढ्याला शब्दरूप अभिवादन करण्यासाठी प्रकाशित करण्यात येणार आहे.
या उपक्रमातून महाड क्रांतीच्या ऐतिहासिक वारशाचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रभावीपणे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या काव्यसंग्रहासाठी नामवंत तसेच नवोदित कवींना सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कवींनी समता, सामाजिक न्याय, मानवता, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, मौलिक विचार, सत्याग्रह आणि महाड क्रांती या विषयांवर आधारित आशयसंपन्न व दर्जेदार मानवतावादी कविता पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राप्त होणाऱ्या कवितांपैकी निवडक कवितांचीच निवड करण्यात येणार असून, कविता स्वतःची आणि अप्रकाशित असणे आवश्यक आहे. प्रथम सहभाग नोंदविणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त भव्य प्रकाशन सोहळा तसेच कवी संमेलन आयोजित सार्थक साहित्य प्रकाशन मार्फत करण्यात येणार आहे, सहभागी कवींना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक कवींनी प्रा. आशा रणखांबे (सार्थक साहित्य प्रकाशन) व साहित्यिक नवनाथ रणखांबे यांच्याशी 9967435032/9967480932 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
