रमजान महिन्याचा पूर्वार्ध पूर्ण होऊन उत्तरार्ध सुरू झाला आहे. सतरा दिवस कसे निघून गेले ते कळले देखील नाही. आता प्रत्येक घरातील वातावरण रमजानमय झाले आहे.
कुरआन शरीफचे दुसऱ्यांदा तर काहींचे तिसऱ्यांदा वाचन सुरु आहे. कुरआन मध्ये अल्लाहने असे म्हटले आहे कि, अजाणतेपणामुळे झालेल्या चुका अल्लाह माफ करील पण जाणूनबुजून, मुद्दामहून केलेल्या चुकांना माफी नाही, कुणीही कुणाचे गुन्ह्याचे ओझे उचलू शकणार नाही, ज्याचा भार त्यालाच पेलावा लागेल.
अल्लाहचे आदेश उपदेश रुपाने लोकांपर्यंत पोहोचवा, गरीबी व दारिद्रयाच्या भितीने आपल्या मुला-मुलींची हत्या करू नका, ज्या गोष्टीचे ज्ञान नाही, तिच्या मागे धावू नका. निराधार व अस्पष्ट कामांच्या मागे लागू नका, परवानगीशिवाय कुणाच्याही घरात प्रवेश करू नका, जीवनाकडे दुर्लक्ष करू नका.
जे अल्लाह वर यकीन (विश्वास) ठेवतील, अल्लाह त्यांचे सरंक्षण करील. जमीनीवर सावकाश व आरामात चला, अल्लाह ची तुलना कुणाशी करू नका. समलैंगिक संबंधापासून नेहमी दूर रहा, चांगल्या कामाचा नेहमी उपदेश करा, वाईट कामाची मनाई करा, जमिनीवर गर्वाने चालू नका, अल्लाह शिर्क (अल्लाह समान अन्य कुणाला सामिल करणे) शिवाय सर्व गुन्हे माफ करील, वाईटाला चांगल्याने नामशेष करा, विचारविनिमय (मशवरा) करुन कामे हाती घ्या.
अल्लाहच्या दृष्टीने ज्ञानी लोक श्रेष्ठ आहेत, गैर मुस्लिमांशी उचित सद्वर्तन करा, चुका झाल्यास अल्लाहशी माफी मागा, तो दयाळू व माफ करणारा आहे. अशा प्रकारच्या मानवतेशी निगडीत खूप सूचना (हिदायात) कुरआन मध्ये अल्लाहने केल्या आहेत.
या सर्व सूचनांचा प्रत्येक व्यक्तिने आपल्या दैनंदिन जीवनात वापर केल्यास जगातून सर्व प्रकारची दुष्कृत्य नामशेष होतील यासाठी प्रत्येकाने या सूचना अंगीकारल्या पाहिजेत.
भारतासारख्या बहुधर्मिय देशात अनेक चालीरितींची सरमिसळ होऊन त्या रुढ झाल्या आहे, मात्र यातील चांगल्यांचा स्विकार व वाईटांचा इन्कार करुन आपले जीवन इतरांना व स्वतःला ही प्रेरणादायी वाटेल, असे वर्तन प्रत्येक स्त्री-पुरुषांकडून होणे अपेक्षित आहे.
कुरआन हा दैवी ग्रंथ फक्त मुस्लीमांसाठी नाही तर जगभरातील समस्त मानवजातीसाठी आहे व तो जगाच्या प्रत्येक भाषेत उपलब्ध आहे. जगात कोट्यावधी लोक आज कुरआन चा अभ्यास करीत आहेत. त्याचा अर्थ समजाऊन घेत आहे. त्यात सांगीतलेल्या बाबींची पडताळणी करून घेत आहेत. त्याप्रमाणे आचरण करीत आहेत. त्याला अंगीकारित आहेत.
कुरआन मध्ये प्रत्येक गोष्टीशी संबंधित मार्गदर्शन सामावलेले आहे. कुरआन हा जीवनाचा गाईड असून प्रत्येकाने तो समजून घेण्याची गरज आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक कुरआनच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. जगात घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांचे भाकित कुराणमध्ये पंधराशे वर्षांपूर्वीच नमूद केले आहेत. त्याप्रमाणे आज जगात घटना घडत आहेत. यापासून समस्त मानव जातीने बोध घेऊन आपल्या आचरण दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082